इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात तीन जण महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटुंबातील आहे. राजकुमार जयस्वाल, पत्नी श्रध्दा जयस्वाल व त्यांची दोन वर्षाची मुलगी काशी राजकुमार जयस्वाल अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे वणी शहरावर शोककळा पसरली आहे. सुदैवाने या कुटुंबातील विवान नावाचा मुलगा पांढरवडा येथील आजी – आजोबांकडे असल्याने बचावला आहे.
आर्यन एव्हिएशन कंपनीचे हेलिकॅाप्टर केदारनाथमधील गरुडचट्टीजवळ खराब हवामानामुळे कोसळल्याचे बोलले जात आहे. ही दुर्घटना झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर येण्यास सुरुवात झाली. यानंतर गवत कापणा-या महिलांनी तात्काळ प्रशासनाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर एनडीआरएफ आण एसडीआरएफच्या टीम्स लगेच घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघातात पायलटसोबत ५ प्रौढ आणि दोन लहान मुलं प्रवास करत होते. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्पर सिंह धामी यांनी म्हटले आहे की, रुद्रप्रयाग जिल्ह्यात झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताबद्दल अतिशय दुःखद बातमी मिळाली आहे. एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. मी सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बाबा केदार यांना प्रार्थना करतो.
गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी या घटनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर पहाटे ५ वाजताच्या सुमारास केदारनाथहून गुप्तकाशीसाठी उड्डाण केले. पण ते वाटेत गौरी कुंडजवळ कोसळले. हे ठिकाण ७ किमी ट्रेकिंग मार्गावर आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके तिथे पाठवण्यात आली आहेत. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोणीही वाचण्याची शक्यता नाही. या हेलिकॉप्टरमध्ये पायलट चौहानसह सहा जण होते. प्रवाशांपैकी एक लहान होता आणि एक बीकेटीसी (श्री बदरीनाथ केदारनाथ मंदिर समिती) कर्मचारी होता.