गोरखपूर (उत्तर प्रदेश ) : लोकप्रतिनिधी म्हणजे जनतेचे सेवक होय, असे लोकशाही व्यवस्थेमध्ये म्हटले जाते. त्यामुळे जेव्हा लोकांवर एखादे संकट कोसळते, तेव्हा या लोकप्रतिनिधीने तातडीने त्यांच्या समस्या निवारण्यासाठी धावून जाणे आवश्यक असते. मात्र काही वेळा लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यास त्यांना जनतेच्या रोषाला किंवा संतापाला सामोरे जावे लागते, मग तो लोकप्रतिनिधी खासदार असो की आमदार असो. उत्तर प्रदेशात देखील एका लोकप्रतिनिधीला जनतेच्या रोषाला असेच सामोरे जावे लागले.
गोरखपूर जिल्ह्यातील बांसगाव विभागाचे भाजपचे खासदार कमलेश पासवान यांना सोमवारी ६ रोजी पूरग्रस्त भागामध्ये लोकांच्या निषेधाला सामोरे जावे लागले. कारण या भागात पुराचे पाणी ओसरल्यावर खासदारांच्या आगमनामुळे लोक संतापले. यावेळी तेथील काही लोकांनी सांगितले की, जेव्हा पुराच्या पाण्यात हजारो लोक अडकले होते, तेव्हा खासदार बेपत्ता राहिले. त्यानंतर आता इकडे आले, त्यामुळे त्यांना पाहून गावकरी चिडले. तसेच परत जा आणि घोषणा देऊ लागले. संतप्त ग्रामस्थांनी खासदारांना पुढे जाऊ दिले नाही. दरम्यान, काही ज्येष्ठ लोकांनी या गावकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांनी ऐकले नाही आणि ते खासदारांना विरोध करत राहिले. त्यामुळे खासदारांना परतावे लागले. गावकऱ्यांनी केलेल्या निषेधाचा व्हिडिओ काढण्यात आला. त्यानंतर गोरखपूरमध्ये तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
इतर गावांना दिल्या भेटी
या गोंधळानंतर खासदार पासवान यांनी एनडीआरएफ टिम आणि महसूल अधिकाऱ्यांच्या पथकासह मारुंड गाव, सिल्हेटा, मुंडेरा, जयरामकोल, भरोहिया, साधना, बसुही गोरसैरा इत्यादी गावांना भेट दिली आणि पीडित कुटुंबाला अन्न मदत किट वाटप केले. या दरम्यान त्यांनी सांगितले की, पूरग्रस्त भागात कोणत्याही कुटुंबाला कुठलीही अडचण येऊ दिली जाणार नाही. काही अडचण असल्यास, आम्हाला लगेच कळवा म्हणजे तातडीने मदत केली जाईल.