नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सरकारने ‘जम्मू आणि काश्मीर इत्तिहादुल मुस्लिमीन’ (जेकेआयएम) आणि ‘अवामी ॲक्शन कमिटी’ (एएसी) यांना अनधिकृत कारवाई (प्रतिबंध) अधिनियम (युएपीए) १९६७ च्या कलम ३(१) अंतर्गत ५ वर्षांसाठी बेकायदेशीर संघटना घोषित केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी एक्स या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये सांगितले की, या संघटना लोकांना कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करण्यासाठी भडकवत होत्या आणि भारताच्या एकात्मता व अखंडतेला मोठा धोका निर्माण करत होत्या. त्यांनी असेही स्पष्ट केले की, राष्ट्राच्या शांतता, सुव्यवस्था आणि सार्वभौमत्वाच्या विरोधात काम करणाऱ्या कोणालाही मोदी सरकारच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
‘जम्मू आणि काश्मीर इत्तिहादुल मुस्लिमीन’ (जेकेआयएम) आणि ‘आवामी ॲक्शन कमिटी’ (एएसी) चे सदस्य जम्मू आणि काश्मीरला भारतापासून तोडण्याच्या उद्देशाने राष्ट्रविरोधी आणि विध्वंसक कारवायांमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी जनतेमध्ये असंतोष पसरवणे, कायदा-सुव्यवस्था अस्थिर करण्यासाठी लोकांना भडकवणे, दहशतवादाला पाठिंबा देणे आणि सरकारविरोधी द्वेष पसरवणे यांसारख्या कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे.