मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. अराजकता निर्माण करणे आणि सरकारी काम रोखण्यासाठी तिन्ही नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. ठाकरे पिता-पुत्र आणि संजय राऊत यांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदेला न्यायालयाने स्थगिती द्यावी. एकनाथ शिंदे गटाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या विविध भागात फिरण्यावरही बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पाटील यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की, बंडखोर आमदारांना सुरक्षेचा धोका असल्याने ते गुवाहाटीला गेले आहेत. राऊत आणि ठाकरे यांच्याकडून धमक्या येत असल्याने जीव वाचवण्यासाठी ते तिथे गेले आहेत. हेमंत पाटील यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की, शिवसेनेत सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे कार्यकर्ते राज्याच्या विविध भागात आंदोलन करत आहेत. लोकांच्या मनात भीती निर्माण व्हावी म्हणून हा प्रकार घडत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शिवसैनिक अनेक ठिकाणी हिंसाचार आणि दंगली करत आहेत, असे ते म्हणाले.
पाटील यांनी अर्जात नमूद केले आहे की, ‘केवळ उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या सांगण्यावरून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आंदोलने केली जात आहेत. एवढेच नाही तर समाजकंटकांकडून सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान केले जात आहे. पोलीस मात्र सर्व काही मूकपणे पाहत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, अशी राज्यातील स्थिती आहे. असे काही झाल्यास ठाकरे पिता-पुत्र आणि संजय राऊत जबाबदार असतील. केंद्र सरकारने बंडखोर आमदारांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे. यावरून परिस्थिती योग्य नसून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची केंद्र सरकारला काळजी असल्याचे स्पष्ट होत आहे.
पाटील यांनी अधिवक्ता आर. एन. कचवे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत न्यायालयाने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश डीजीपींना द्यावेत, असे म्हटले आहे. यानंतर ठाकरे पिता-पुत्र आणि संजय राऊत यांच्यावर एफआयआर नोंदवावा. या लोकांनी राज्यात अराजकता पसरवण्यासाठी लोकांना प्रेरित केले आहे, असा आरोपही पाटील यांनी केला आहे.
Shivsena Uddhav Aditya Thackeray Sanjay Raut PIL Mumbai high court Maharashtra