इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी भाषेत एक म्हण आहे, ‘दैव देते अन् कर्म नेते ‘ असाच काहीसा प्रकार काही जणांच्या जीवनात घडतो. एखाद्या व्यक्तीला मौल्यवान वस्तू सापडते परंतु ती त्याच्या नशिबात नसते, असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव तालुक्यात एका खेडेगावात एका व्यक्तीला असेच एक मोठे घबाड घावले होते, तो मुंबईत असताना सोन्याची बिस्किटे असलेली सुटकेस त्याला सापडल्याची म्हटले जाते. सदर घटना सुमारे चाळीस वर्षांपूर्वीची आहे. परंतु त्याच्या नशिबात ती सोन्याची बिस्किटे नव्हती, कालांतराने चौकशी झाल्यावर ती बिस्किटे पोलिसात जप्त करण्यात आली असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशात नुकताच घडला.
ग्वाल्हेरच्या नजिक भितरवार हद्दीतील विज कपूर वाळूच्या खाणीवर दोन मुलींना सुमारे २०० सोन्याची नाणी सापडली. जणू काही त्यांचे भाग्य उजाडले यावर एका मुलीचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्याकडील सर्व नाणी घेऊन गेले. त्याचवेळी दुसऱ्या मुलीचे नातेवाईक नाणी वाटपासाठी घटनास्थळी गेले, मात्र काही निष्पन्न न झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या व्यक्तींना पोलीस ठाण्यात नेले. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी बघेल समाज आणि पंडित समाज यांच्या मुली वाळूच्या खाणीवर खेळत होत्या. तेव्हा बघेल समाजातील मुलीला दोन सोन्याची नाणी दिसली. यानंतर पंडित समाजातील मुलगीही तेथे पोहोचली आणि तिने कुटुंबीयांना याची माहिती दिली. तेव्हा तिचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शोधाशोध सुरू केली.
यावेळी त्याला एका पेटीत २०० नाणी सापडली आणि तेथून तो त्याच्या घरी घेऊन गेला. बघेल समाजातील कुटुंबीयांना ही बाब समजताच त्यांनी वाटणी करण्याबाबत मागणी केली. मात्र यादरम्यान वादावादी झाली. या वादामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही मुलींना पोलीस ठाण्यात नेले. यासोबतच तेथे सापडलेली २०० गाणी जप्त करण्यात आली आहेत. सोन्याची नाणी साडण्याची घटना संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली, सर्वांच्या तोंडी एकच गोष्ट होती की, किती सोन्याची नाणी सापडली आहेत. दुसरीकडे पोलीस गावात पोहोचल्यावर ही नाणी त्या मुलींचीच असतील की पोलीस जप्त करणार, अशी चर्चा सुरू झाली होती. तसेच पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले की, वाळूच्या खाणीवर नाणी सापडली आहेत, त्याबाबत पोलिसांकडून आम्हाला माहिती मिळाली होती, ही नाणी सोन्याची आहेत की नाही ? हे तपासानंतरच कळेल. तसेच ती कोणत्या काळातील आहे हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.