त्र्यंबकेश्वर – एका तिर्थकुंडाच भूमिपूजन करतांना लगतच राहणार्या नगरसेविकेला व त्याच प्रभागातील अजून एका नगरसेविकेला डावलल्याचे कारणावरुन त्र्यंबक नगरीत काल मानापमान नाट्य पहावयास मिळाले. सदर वादविवाद सोशल मीडियावर लाईव्ह केल्याने दिवसभर नगरीत याचीच चर्चा होती.
याबाबत सविस्तर हकिकत अशी की, येथील नगर परिषदेत सतरा नगरसेवकांपैकी भाजपाचे पंधरा तर शिवसेनेचे दोन नगरसेविका आहेत. नगराध्यक्षही भाजपाचाच आहे. आतापर्यंत सर्व सुरळीत चालु होते. मात्र मागील महिन्यात उपनगराध्यक्षपदाची निवड झाली. यावेळी शीतल उगले या इच्छुक होत्या. मात्र त्यांना डावलून उपनगराध्यक्षपदाची माळ त्रिवेणी तुंगार यांच्या गळ्यात पडली, तेव्हापासून भाजपच्या नगरसेवकांमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे विकासकामांची माहिती मिळत नाही. कार्यक्रमाचे अजेंडा प्राप्त होत नाही. तसेच श्रावण महिना नियोजनात देखील बैठकांना बोलावून विश्वासात घेत नसल्याचे विरोधी गटाचा आरोप आहे. अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या परस्परांच्या नाराजीचे शनिवारी सूर्यकुंडाच्या भूमिपूजनाप्रसंगी पडसाद उमटले.
प्रभाग क्र. ७ मध्ये कुशवर्ता जवळ इंद्रतीर्थ तलावाचे सुशोभीकरण ‘प्रसाद’ योजनेतून हाती घेतले आहे. ते पूर्ण झाले, मात्र त्याच्या बाजूचे सूर्यकुंडाची डागडुजी बाकी आहे. शनिवारी नगरसेवक कैलास चोथे यांचा वाढदिवस होता. त्यांच्या हस्ते याच्या भूमिपूजनासाठी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, गटनेते समीर पाटणकर, अशोक घागरे, भाजप शहराध्यक्ष सुयोग वाडेकर उपस्थित होते. यावेळी बाजूच्या काही नागरिकांना बोलावले असता प्रभाग सातच्या नगरसेविका मंगला आराधी यांनी प्रभागात भूमिपूजन करताना नगरसेवकांना का बोलावले नाही, असा जाब विचारला. यानंतर मंगला आराधी, नगरसेविका कल्पना लहांगे, शीतल उगले यांनी पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षा हेच नगरपरिषद चालवत असल्याचा आरोप केला. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आराधी म्हणाल्या.
दरम्यान नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी आम्ही सहकारी नगरसेवकाचा वाढदिवस असल्याने सूर्यकुंड या तीर्थाचे पुनर्जीवन करण्याच्या चांगल्या कामाचा प्रारंभ करावा या हेतूने आलो होतो, असे सांगितले. गटनेते पाटणकर यांनीदेखील हा ऐनवेळेचा कार्यक्रम असल्याने कोणालाही नाराज करण्याचा विषय नसल्याचे सांगितले. मात्र सदर वादाचे सोशल मिडीयावरुन थेट प्रक्षेपन केले गेल्याने दिवसभर गावात उलटसुलट प्रतिक्रीया उमटत होत्या.