त्र्यंबकेश्वर – श्रावण महिन्याचा चौथा सोमवार व जन्माष्ठमी असा योग जुळुन आल्याने भाविकांनी आज येथे चांगली गर्दी केली होती. राज्यातील धार्मिक स्थळांप्रमाणे भगवान त्र्यंबकेश्वराचे मंदिर अद्यापही बंद असल्याने याही सोमवारी शिवभक्तांना भगवान त्र्यंबकराजाच्या शिखर दर्शनावरच समाधान मानावे लागले. मात्र रविवारी मध्यरात्री पासुन अनेक भाविक ब्रह्मगिरी प्रदक्षणेला मार्गस्थ झाले. पोलीसांनीही थोडं नरमाईचे धोरण स्विकारल्यामुळे सकाळीसुध्दा गटागटाने मात्र कमी संख्येने भाविक प्रदक्षणेला जात होते.
आधीच्या तीनही सोमवार प्रमाणेच या सोमवारच्या पुर्वसंध्येला म्हणजे रविवारी रात्री ८ वाजे पासूनच श्री स्वामी समर्थ केंद्र रिंगरोड व श्री महादेवी मंदिराजवळ नाकेबंदी करुन पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्र्यंबकेश्वराच्या मंदिर महाद्वाराच्या पायरी जवळ भाविक थांबुन गर्दी होऊ नये म्हणुन मंदिराच्या मुख्य महाद्वारा समोर व कुशावर्त तिर्थ याठिकाणी बॅरेकेडींग लावुन पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे आधीच्या तिनही सोमवार प्रमाणे चौथा सोमवारही भाविकांना शिखर दर्शनावरच समाधान मानावे लागले.
दुपारी तीन वाजता दुपारी ३ वाजता पारंपारीक पद्धतीने भगवान त्र्यंबक राजाचा पालखी सोहळा संपन्न झाला. पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला. बॅण्डच्या तालावर वाजतगाजत पालखी कुशावर्त तिर्थावर आणण्यात आली. या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पुजा अभिषेक करण्यात आला. सोमवार पालखीचे वंशपरंपरागत पुजक वेदमुर्ती चिन्मय फडके यांनी पुजा केली तर शागिर्द म्हणुन समिर दिघे, मंगेश दिघे व यज्ञेश कावनईकर यांनी सेवा दिली. आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली . या सोहळ्यात मंदिर संस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी, भुषण अडसरे, संतोष कदम, अॅड. पंकज भुतडा, यांचे सह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी सामील झाले होते. पोलीसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.