मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पर्यटनस्थळांच्या ठिकाणी ‘सुरक्षा दल’ हा पर्यटन विभागाकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबईतील पर्यटनस्थळावरती सुरक्षेच्या दृष्टीने ‘गेट वे ऑफ इंडिया’ आणि ‘गिरगाव चौपाटी’, नरिमन पाँईट येथे ‘पर्यटन सुरक्षा दल’ नेमण्याची कार्यवाही करा, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
यासंदर्भात मंत्री देसाई यांच्या मेघदूत या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पयटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखर जयस्वाल यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले, सध्या महाबळेश्वर येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘पर्यटन सुरक्षा दल’ हा उपक्रम सुरू आहे. टप्प्या-टप्प्याने या उपक्रमाची राज्यात व्याप्ती वाढविण्यात येत आहे. मुंबईत पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असून पर्यटकांना सुरक्षा दिल्यास सुरक्षित पर्यटन होऊन पर्यटन वाढीला चालना मिळेल. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, नरिमन पाँईट येथे ‘पर्यटक सुरक्षा दल’ नेमण्यात यावेत. राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन सुरक्षा दलासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री देसाई यांनी यावेळी दिल्या.









