त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वत्र सुखशांती नांदावी, नागरीकांचे आरोग्य चांगले रहावे, रोगराईची साथ गावात येऊ नये यासाठी कार्तिक पौर्णिमेचे दिवशी समस्त ग्रामवासीयांच्या वतीने त्र्यंबकेश्वरची ग्रामदेवता श्री महादेवीला बैलगाडीभर भाताचा बळी अर्पण करण्यात आला. गेले तीनशे वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.
या निमित्त गावातील नागरीकांनी आपल्या इच्छेनुसार तांदुळ आणुन कुशावर्तावर जमा केले. कुशावर्ताच्या पवित्र पाण्यामध्ये तांदुळ भिजवून त्याचा भात तयार करण्यात आला. शिजवलेला भात एका बैलगाडीमध्ये भरण्यात आला. भाताच्या मधोमध टेंभा लावण्यात आला. वेदमंत्राच्या जयघोषात बलीची यथासांग पुजा करण्यात आली. या पुजेचा मान परंपरेने पेंडोळे , देशमुख , मुळे, महाजन आणी खांडेकर या घराण्यांकडे आहे. बलीची पुजा सुरू झाल्यावर भातामध्ये रोवलेला टेंभा प्रज्वलीत करण्यात आला. सजवलेले बैल बैलगाडीला जुंपण्यात आले. मशाल सांभाळण्याचा मान गंगापुत्र घराण्याकडे आहे. त्यांच्या वतीने मनोज गंगापुत्र यांनी मशाल सांभाळली. पुढे बॅण्ड पथक त्यामागे भात बळीची गाडी त्यामागे वेदमंत्राचे पठण करणारे शेकडो ब्रह्मवृंद आणि त्यांचे मागे शेकडो ग्रामस्थ अशा सर्व लव्याजम्यासह बळीची मिरवणुक ठिक बारा वाजता कुशावर्ता तिर्थापासून निघाली. भगवती चौक, बोहर पट्टी, श्री लक्ष्मीनारायण चौक , त्र्यंबकेश्वर मंदिर , डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक, नगर परिषद कार्यालया समोरून पोलीस स्टेशन समोरील श्री महादेवी मंदिरा समोर मिरवणुक नेण्यात आली. तेथे महादेवीची पूजा करुन हा बली देवीला अर्पण करण्यात आला तर मशाल देवी मंदिरा बाहेर ठेवण्यात आली. यावेळी हजारो नागरीकांनी परंपरेनुसार देवीला नारळ फोडून प्रसाद व मशालीचा अंगारा घरी नेला. परंपरेनुसार प्रदीप तथा दादु गाजरे यांची बैलगाडी होती. यावेळी पुरोहित संघ, श्री महादेवी संस्थान विश्वस्त मंडळ, श्री महादेवीचे पुजारी गाजरे बंधु, विकी गंगापुत्र, राजेंद्र गंगापुत्र, भुषण भोई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.