नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सध्या पावसाचे दिवस आहेत. पावसाळी पर्यटनासाठी नागरिक घराबाहेर पडतात. अशा वेळेस पर्यटकांनी धोकादायक, प्रतिबंधक क्षेत्रात पोहोण्यासाठी जाऊ नये, अशा ठिकाणी छायाचित्रे, सेल्फी काढणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी केले आहे.
जोखमीच्या ठिकाणी जाणे टाळावे
जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी म्हटले आहे की, पाऊस, चिखलामुळे घसरून किंवा दगडांवरून पाय घसरून अपघात होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणांवर जाणे टाळावे अथवा योग्य ती खबरदारी घ्यावी. धोकादायक, प्रतिबंधित क्षेत्रांच्या ठिकाणांवर जाऊ नये. (उदा. जलसंपदा विभागामार्फत पोहण्यासाठी प्रतिबंधित धरणे, खोल धबधबे, निसर्डी ठिकाणे, जलाशये इत्यादी), नागरिकांना ज्या क्षेत्राची, ठिकाणांची माहिती अथवा जोखीमबाबतची माहिती नसेल अशा ठिकाणांवर जाणे टाळावे. आपण ज्या ठिकाणावंर पर्यटनासाठी, गड-किल्ले, धरणे, धबधबे इत्यादी ठिकाणांवर ट्रेक / ट्रेल / सहल इति. साठी जाणार आहोत, तेथील भौगोलिक माहिती, त्या ठिकाणांवर जाताना आवश्यक साधनसामग्री सोबत असणे आवश्यक आहे. जाताना कोणत्या प्रकारचा पेहेराव घालणे आवश्यक आहे. याबाबत व इतर अनुषंगिक माहिती घेऊनच सदर ठिकाणी जाणे योग्य राहील.
मार्गदर्शकाची मदत घ्यावी
अशा ठिकाणांवर जाताना समवेत अनुभवी व्यक्ती, गट अथवा या ठिकाणांवरील मार्गदर्शकाची (गाईड) मदत घ्यावी. पाण्याच्या ठिकाणी पोहता येत असेल, तरीही लाइफ जॅकेट घालावे. पाण्यात उतरणे गरजेचे असल्यास, योग्य ती साधनसामग्री व्यवस्थित तपासून व योग्य ती काळजी घेऊनच पाण्यात उतरावे. धोकादायक ठिकाणी छायाचित्रे, सेल्फी काढणे टाळावे. तेथील शिस्त पाळत सुरक्षेची काळजी घ्यावी. पर्यटनाच्या दृष्टीने व स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक साधनसामग्री सोबत ठेवावी. सुरक्षित पर्यटनाच्या दृष्टीने हवामानाविषयक माहिती घेऊनच घराबाहेर पडावे. त्यासाठी भारतीय हवामानखात्याच्या संकेतस्थळास भेट देऊन अथवा “मौसम”, “दामिनी”, “सचेत” या सारख्या अधिकृत अॅप्स् द्वारे देखील माहिती मिळवावी. शासनाचे अधिकृत संकेतस्थळ / अॅप्स् इ. आधार घावा / त्यावरील माहितीवरच विश्वास ठेवावा. (उदा. राज्य आपत्ती व्यवस्थापन – Twitter Handle https://x.com/SDMAMaharashtra?t=lZB0mmkxfgesANv1aNuhXw&s=09)
वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे
खासगी, स्वत:च्या वाहनाने बाहेर जात असाल, तर वाहतूक नियमांचे पालन करून व योग्य ती खबरदारी घेऊन वाहन चालवावे. पर्यटनस्थळी गेल्यानंतर आपली वाहने व्यवस्थितरीत्या पार्क करावीत. आपल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी / अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, वैद्यकीय सेवा आणि आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन यांचे संपर्क क्रमांक सोबत ठेवावेत. विशेषतः दुर्गम किंवा धोकादायक ठिकाणी एकट्याने न जाता, गटाने प्रवास करावा. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत एकमेकांना मदत मिळू शकेल. किरकोळ जखम किंवा आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचारासाठी वैद्यकीय किट सोबत ठेवावे. तसेच प्रथमोपचाराची मूलभूत माहिती असावी.
वन्य प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे
वन्यप्राण्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी अंतर राखावे, त्यांना खाद्य देऊ नये आणि वनक्षेत्रातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. ट्रेकिंग किंवा जलाशयांच्या ठिकाणी मद्यपान किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन टाळावे. यामुळे निर्णय क्षमता कमी होऊन अपघात होऊ शकतात, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी म्हटले आहे.
पर्यटनस्थळी सूचना फलक लावावेत
सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सूचना फलक संबंधित विभागांनी आपापल्या अधिपत्याखालील ठिकाणांवर लावावेत. धोकादायक ठिकाणी सेल्फी / छायाचित्रे काढू नये, याबाबतची माहिती द्यावी. आपत्कालिन संपर्क क्रमांकासह सूचना फलक लावावेत. पर्यटनस्थळ, गड-किल्ले, धरण, धबधबे इत्यादी ज्या विभागांच्या अखत्यारीत आहेत, त्या विभागांनी या स्थळांच्या क्षमतेनुसारच पर्यटक सदर स्थळांवर जातील याबाबतची दक्षता घ्यावी. तसेच नागरिकांपर्यंत प्रतिबंधित नसलेल्या ठिकाणास भेट देण्यासाठीची वेळ (Entry & Exit Timings) नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करावी. त्यासाठी संबंधित विभागाचे अधिकृत संकेतस्थळ, अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल, अशा विविध माध्यमांचा वापर करून नागरिक, पर्यटकांपर्यंत अचूक माहिती पोहोचेल, अशी दक्षता घेत उपाययोजना कराव्यात.
आवश्यक तेथे पोलिस बंदोबस्त ठेवावा
पोलिस विभागाद्वारे आवश्यक ठिकाणांवर बंदोबस्त ठेवावा. जलाशय, धोकादायक ठिकाणांच्या आजूबाजूला सुरक्षित क्षेत्रे स्पष्टपणे निश्चित करून कुंपण किंवा सीमारेषा दर्शवावी. टोकाच्या परिस्थितीत जोखीम न पत्कारण्याबाबत सूचित करावे जेणेकरून संभाव्य आपत्कालीन परिस्थिती / अपघात टाळण्यात मदत होईल. पोलिस, वनविभाग, पाटबंधारे विभागांनी आपल्या हद्दीत पोहणारे/जीव रक्षक, सर्प मित्र, स्वयंसेवक, गिर्यारोहक तसेच आपत्कालीन परिस्थितीत शोध व बचाव कार्यात मदत करू शकणाऱ्या व्यक्तींना बचाव कार्यात सहभागी करून घ्यावे. त्यांच्यासाठी आपत्कालीन परिस्थिती निवारणाच्या दृष्टीने प्रशिक्षण / शिबिर आयोजित करून मदत व बचाव कार्यासाठी लागणारे साहित्य त्यांना उपलब्ध करून द्यावे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाी करावी
पर्यटनासाठी वेळ निश्चित करुन सूर्यास्तानंतर पर्यटक तेथे जाणार नाहीत याबाबत उपाययोजना करावी. आवश्यकता भासल्यास नियमांचा भंग करणा-या विरुध्द आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. पोलीस विभागाद्वारे (वाहतूक पोलिस आणि महामार्ग पोलिसांसह) अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. यामध्ये वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी, वाहतूक नियमांची अंमलबजावणी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडपत्रके देण्यासाठी पथके तैनात करावीत. आवश्यकतेनुसार तत्काळ वैद्यकीय पथकांसह समन्वय साधावा व उचित कार्यवाही करावी. पर्यटनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाल्यास वाहतुकीवर परिणाम होतो. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग स्थानिक रस्त्यांवर अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. हे टाळण्याकरिता राष्ट्रीय महमार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्या., सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद (बांधकाम विभाग) यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या रस्त्यांबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात. सुरक्षित पर्यटनाच्या अनुषंगाने सर्व विभाग प्रमुखांनी आवश्यकत्या उपाययोजना करून त्याबाबतची माहिती विविध जनजागृतीपर माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचवावी.
फलक, पुलांचे संरचनात्मक परीक्षण करावे
महानगरपालिका, नगरपरिषद/नगरपंचायत, सावर्जनिक बांधकाम विभाग, इ. क्षेत्रातील सर्व जाहिरात फलकांचे (Hoarding), पूल, इ. चे संरचनात्मक परीक्षण (Structural Audit) करण्यात आली असल्याची खात्री करावी. अवकाळी पाऊस, वादळावेळी जाहिरात फलकामुळे होणारे अपघात टाळण्याकरिता आवश्यक उपाययोजना कराव्यात. विनापरवानगी लावण्यात आलेले / अवैध व धोकादायक होर्डिंग / बॅनर्स तत्काळ काढून घेऊन संबंधितावर नियमानुसार कठोर कार्यवाही करावी. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जाहिरात फलकाच्या / धोकादायक ठिकाणांच्या आजू- बाजूला न थांबण्याबाबत नागरिकांना सूचना देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी.
पर्यटनस्थळांवरील गर्दीचे व्यवस्थापन करावे
लोकप्रिय पर्यटनस्थळांवर, विशेषतः पावसाळ्यातील शनिवार-रविवारी गर्दी टाळण्यासाठी संबंधित विभागाने स्थळ-विशिष्ट गर्दी व्यवस्थापन योजना तयार करावी आणि अंमलात आणावी. अचानक मुसळधार पाऊस किंवा वादळापासून संरक्षणासाठी प्रमुख पर्यटनस्थळांवर / जवळपास तात्पुरत्या निवारा किंवा विश्रांती स्थळांची उपलब्धता सुनिश्चित करावी. दुर्गम पर्यटनस्थळांवर आपत्कालीन समन्वयासाठी संचार पायाभूत सुविधा (उदा. मोबाइल नेटवर्क कव्हरेज किंवा अधिकृत गाइडसाठी वॉकी-टॉकी) संबंधित विभागाद्वारे उपलब्ध करून द्यावेत. पर्यटनस्थळांवरील घटना किंवा जवळपासच्या अपघातांची माहिती तात्काळ तालुका आपत्ती व्यवस्थापनास / जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे नोंदविण्यासाठी मानक यंत्रणा स्थापन करावी. आपत्कालीन वाहनांसाठी (उदा. रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने, इ.) पर्यटनस्थळांवर जाणारे रस्ते अडथळामुक्त आणि सुस्थितीत ठेवावेत व ही वाहने अपघातप्रवण पर्यटन स्थळांजवळ त्वरित उपलब्ध होतील, याबाबतची व्यवस्था सुनिश्चित करावी.
पर्यटकांनी सामाजिक जबाबदारी पाळावी
सर्व संबंधित विभागांनी आवश्यकत्या उपाययोजना व स्थानिक परिस्थितीनुसार इतर उपाययोजना आवश्यक असल्यास त्याबाबत त्वरित नियमानुसार कार्यवाही करावी. पर्यटकांनी केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने नव्हे, तर सामाजिक जबाबदारी म्हणूनही पर्यावरण व सुरक्षिततेचे भान ठेवावे. प्रशासनाकडून निर्गमित होणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी म्हटले आहे.