मुंबई – टोकियो ऑलिम्पिकमध्ये ज्या खेळाडूंनी पदके जिंकली, त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे. परंतु असे काही खेळाडू आहेत, जे चौथ्या क्रमांकावर राहिल्याने त्यांना पदके मिळू शकली नाहीत. या खेळाडूंसाठी आता टाटा मोटार्सने मोठी घोषणा केली आहे. कांस्यपदक जिंकू न शकणाऱ्या चौथ्या स्थानावर राहिलेल्या खेळाडूंना अलट्रोज कार भेट देणार असल्याची घोषणा टाटा मोटार्सने केली. त्यांनी पदक जिंकले नाहीत, परंतु कोट्यवधी लोकांची मने जिंकली आहेत. तसेच अब्जावधी लोकांना प्रेरित केले आहे, टाटा मोटर्सने शनिवारी सांगितले.
जे खेळाडू पदकाच्या अगदी जवळ जाऊन ते मिळवू शकले नाहीत, त्यामध्ये सर्वात पुढे गोल्फपटू अदिती अशोकचा समावेश आहे. अदिती फक्त दोन स्ट्रोकने पदकापासून वंचित राहिली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्याशिवाय पहिलवान दीपक पुनिया आणि भारतीय हॉकी संघ सुद्धा चौथ्या स्थानावर राहिली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतची सर्वात्तम कामगिरी करत सात पदके पटकावली आहेत. देशाला एक सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे.
नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याशिवाय मीराबाई चानूने भारत्तोलन आणि पहिलवान रवीकुमार दहियाने कुस्तीमध्ये रौप्यपदक पटकावले. चार कांस्य पदकांमध्ये बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू, मुष्ठीयुद्ध स्पर्धेत लव्हलिना बोरगोहीन, कुस्तीमध्ये बजरंग पुनिया आणि पुरुष हॉकी संघाने पटकावली आहेत.