विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किंमती आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या सध्याच्या व्यवहार्यतेच्या संकटामुळे ऑटो कंपन्यांनी सीएनजी वाहनांवर भर दिला आहे. सहाजिकच टाटासह देशातील अनेक वाहन कंपन्या या सणासुदीच्या काळात सीएनजी इंधनावर चालणारी नवीन वाहने सादर करण्याची तयारी करत आहेत. भविष्यात इलेक्ट्रिक वाहने ग्राहकांची पहिली पसंती ठरणार आहेत, परंतु सध्या महाग पेट्रोल आणि डिझेलपासून सुटका मिळू शकेल, अशा वाहनाची गरज अनेक लोकांना असल्यामुळे सीएनजी वाहनांकडे ग्राहकांचा कल झपाट्याने वाढला आहे. ही मागणी पाहता वाहन उद्योगाने सीएनजी वाहनांवर भर दिला आहे.
देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीला सीएनजी वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे चालू आर्थिक वर्षात सुमारे ३ लाख सीएनजी वाहने विकण्याची अपेक्षा आहे. कंपनीने प्रथम २०१० मध्ये सीएनजी वाहनांची विक्री सुरू केली असून आतापर्यंत ८ लाखांहून अधिक सीएनजी वाहने विकली आहेत.टाटा मोटर्स बाजारपेठेत वाढ करण्यासाठी लवकरच आपल्या अनेक लोकप्रिय पेट्रोल मॉडेल वाहनांच्या सीएनजी आवृत्त्या बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ८ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या हॅचबॅक आणि सेडानची सीएनजी वाहने बाजारात आणण्याची टाटाची योजना आहे. दोन वर्षात आतापर्यंत सीएनजी वाहनांचा बाजार हिस्सा ६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्याचबरोबर या काळात डिझेल वाहनांची विक्री ३५ टक्क्यांनी कमी झाली आहे.
या कंपन्यांचे म्हणणे आहे की कोरोना साथीमुळे, आता अधिकाधिक ग्राहकांना त्यांचे वैयक्तिक वाहन खरेदी करायचे आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात विक्री चांगली राहण्याची अपेक्षा आहे. इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्ला ने भारतातील इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाला सरकारने प्रतिसाद दिला आहे. मात्र अवजड उद्योग मंत्रालयाने टेस्लाला प्रथम आपल्या इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन भारतात सुरू करण्यास सांगितले आहे, त्यानंतरच ते कोणत्याही कर सूटचा विचार केला जाणार आहे.