…म्हणून ‘जलसुरक्षा’ महत्वाची!
”नैर्ऋत्य मोसमी पावसाचा दिलासादायक अंदाज भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी जाहीर केला. यंदा देशात ९८ टक्के म्हणजेच सर्वसाधारण पाऊस होणार आहे. महाराष्ट्रातील पावसाचा टक्काही सर्वसाधारण राहणार असून, मुंबईसह कोकण विभाग, विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. देशात एकूण पावसापैकी ७५ टक्के वाटा नैर्ऋत्य मोसमी पावसाचा असतो. बहुतांश कृषी व्यवस्था आणि पाण्याची उपलब्धता याच पावसावर अवलंबून असते. पाऊसपाण्याचा अर्थव्यवस्थेवरही त्याचा थेट परिणाम होतो. ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण समजला जातो. त्यानुसार यंदा ९८ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.”

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
[email protected]
कोरोना, मृत्यू, रुग्णालय, प्राणवायूची कमतरता अशा साऱ्या नकारात्मक बातम्यांच्या पार्श्वभूमीवर पावसाची ही बातमीच अतिशय सुखद ठरली यात वाद नाही. गेल्या काही वर्षांत पावसाचे चक्र बदलले आहे.जूनचा पहिला आठवडा महाराष्ट्रात पाऊस घेऊन येतोच हे गणित बिघडून काही वर्षे झाली. तरी गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. नवी दिल्लीच्या ‘राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रातील वैज्ञानिक आर. के. जेनमणी यांच्या म्हणण्यानुसार एक जून २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या काळात सरासरी ९५.४ सेंटीमीटर पाऊस पडला. १९६१ ते २०१० या काळातील सरासरीच्या विचार केला तर ती ८७.७ सेंटीमीटर आहे, म्हणजेच त्या सरासरीपेक्षा गेल्या वर्षी त्या विशिष्ट काळात जास्त पाऊस झाला.
माणूस विविध मार्गाने निसर्गाला आपल्यापुढे झुकविण्याचा प्रयत्न करत असला तरी गेल्यावर्षी वरुणदेव आपल्यावर मेहेरबान झाला होता. २०२१मध्ये तितका नाही तरी त्याच्या ९८ टक्के ‘नॉर्मल’ असेल असे हवामान खाते म्हणते. हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजावर वर्षभर कितीही विनोद होत असले तरी मार्च ते मी महिन्यात पावसाचा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा यांबाबत जाहीर होणाऱ्या अंदाजाबाबत खूप उत्सुकता असते. आणि या अंदाजाने आपण सारे जण सुखावतोही. हवामान खाते आता बऱ्यापैकी अचूक अंदाज वर्तवते, त्यामुळे हा आनंद जास्त काळ टिकेल अशी आशा करूया.
पाऊस चांगला होणार या बातमीनंतर काळजी वाटते ती पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवण्याची. जलसिंचनाची, जलसाठ्यांची यंत्रणा कशी आहे यावर या पावसाचा आनंद मिळणार का हे अवलंबून असते. नाहीतर पाऊस मुबलक, पण लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, अशी परिस्थिती होते. यापुढची युद्धे पाण्यासाठी होतील असे वाक्य बऱ्याचवेळा ऐकले. पडणाऱ्या पावसाचे नियोजन (साठा) नीट झाला नाही तर पावसावर दोष देण्यात काहीच अर्थ नाही.
