विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवटीने सुरू केलेल्या हिंसाचार आणि दहशतवादी कारवायांमुळे सर्व जग हादरून गेले आहे. सहाजिकच याबाबत भारताला देखील मोठी चिंता वाटत आहे. तालिबानीचे लढाऊ सैनिक हे काश्मीरमध्ये नवा धोका बनू शकतात. काश्मीरच्या सीमेवर त्यांची संशयास्पद हालचाल काही महिन्यांपूर्वीच लक्षात आली. त्यावेळी गुप्तचर एजन्सींनाही सतर्क करण्यात आले होते. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा अत्यंत सावध आहेत. कारण तालिबानने दिलेल्या मदतीच्या बदल्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्था म्हणजेच आयएसआय हे तालिबान लढाऊ सैन्याला काश्मीरमध्ये घुसवू शकते.
सुरक्षा एजन्सींशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीचा काश्मीरवर काय परिणाम होऊ शकतो, याचे विविध गुप्त स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मूल्यांकन केले जात आहे. तालिबानी लढाऊ लोकांनी काश्मीरमध्ये घुसखोरी होऊ शकते, ही सर्वात मोठी चिंता आहे. कारण यापुर्वी आयएसआयने तालिबान लढाऊंना मदत दिली आहे आणि त्यांनाही त्यांची मदत घ्यायची आहे, असे अनेक गुप्तचरांच्या माहितीवरून निश्चित झाले आहे. ठोस पुराव्यांच्या आधारे भारताने ही चिंता जगातील अनेक देशांकडे वारंवार मांडली आहे.
गुप्त सूत्रांचे म्हणणे आहे की, तालिबान लढाऊंच्या एका गटाला आयएसआयने काश्मीरमध्ये लढण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. त्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून खोऱ्याची भौगोलिक स्थिती आणि नकाशे इत्यादी माहिती दिली जात आहे. या सूत्रांनी सांगितले की, सुरक्षा दल तालिबानला अधिक धोकादायक लढाऊ मानतात. जैश-ए-मोहम्मदने अफगाणिस्तानमध्ये तालिबान लढाऊंना मदत केली असून त्या बदल्यात ते काश्मीरमध्ये त्यांची मदत घेतात. परंतु हे अचानक घडले नाही, तर गेल्या एक वर्षापासून तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी सुमारे दोन डझन तालिबानी लढाऊ सीमेवर फिरताना दिसल्यानंतर सुरक्षा दलांना विशेष सतर्कतेवर ठेवण्यात आले होते.