इस्लामाबाद – पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री शेख रशीद हे बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान टी-२० विश्वचषक सामना पाहण्यासाठी संयुक्त अरब अमिराती (यूएई) पोहचले. त्याचवेळी त्यांना पंतप्रधान इम्रान खान यांचा फोन आला. तुम्ही तातडीने पाकिस्तानला परत या असे फर्मान इम्रान यांनी बजावले. अखेर आल्या पावली रशीद यांना माघारी फिरावे लागले आहे. त्यामुळे ही बाब देशभरात चर्चेची ठरत आहे. पाकिस्तानातील अंतर्गत सुरक्षेची परिस्थिती हाताळण्यासाठी रशिद यांना तातडीने देशात परत बोलावल्याचे सांगितले जात आहे. पाकीस्तानमध्ये सध्या आर्थिक संकट तर आहेच परंतु राजकीय आणि सुरक्षा विषयक संकट वाढत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
टीएलपीने आपला प्रमुख हाफिज साद हुसेन रिझवीच्या अटकेविरोधात इस्लामाबादच्या दिशेने “लाँग मार्च” काढण्याची घोषणा केली. त्यामुळे आज रविवार( दि. २४ ) रोजी होणाऱ्या या मोर्चात काही गडबड होऊ नये म्हणून पाकच्या अंतर्गत सुरक्षा मंत्र्यांना देशातत परतण्यास भाग पाडण्यात आले. वास्तविक पंतप्रधानांनी रशिद यांची युएईमध्ये प्रत्यक्ष क्रिकेट गेम पाहण्यासाठीची रजेची विनंती मान्य केली होती. पण त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मंत्र्याला देशात परत येण्याचा आग्रह केला गेला.
इस्लामाबादकडे येणास बंदी घातलेल्या कट्टरपंथी इस्लामी गट तहरीक-ए-लबिक पाकिस्तानच्या आजच्या संभाव्य मोर्चाला रोखण्यासाठी पाकिस्तान निमलष्करी दलाचे ५०० हून अधिक कर्मचारी आणि सीमेवरील १००० जवानांची तुकडी शनिवारी तैनात करण्यात आली आहे. तहरीक-ए-लब्बाईक पाकिस्तानतर्फे TLP च्या मरकज मुख्यालयापासून इस्लामाबादच्या दिशेने शांततापूर्ण नामस-ए-रिसलत मोर्चा नमाजानंतर सुरू होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, रेड झोन आणि फैजाबाद इंटरचेंजच्या आसपास सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. याशिवाय शहरातील प्रवेशाच्या ठिकाणी प्रत्येकी २०० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. याशिवाय फैजाबाद आणि रेड झोनसह विविध ठिकाणी १,४०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
पंजाब सरकारचे दिवंगत संस्थापक खादिम रिझवी यांचा मुलगा हाफिज साद हुसेन रिझवी याला सोडण्यासाठी पंजाब सरकारवर दबाव आणण्यासाठी शेकडो TLP कार्यकर्ते लाहोरमध्ये बसून धरण्यात भाग घेत आहेत. तसेच लाँग मार्चच्या घोषणेपूर्वी जारी केलेल्या निवेदनात, टीएलपीच्या मजलिस-ए-शूराने सांगितले की, आमच्या गटाचे सदस्य गेल्या १५ दिवसांपासून रस्त्यावर “शांततेने निषेध” करत आहेत.