मुंबई – टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना आज रविवारी (२४ ऑक्टोबर) होत आहे. दोन्ही बाजूने सामना जिंकण्याचा प्रयत्न राहणार असला तरी आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याला विश्वचषकात पराभूत करण्याची परंपरा भारत कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. दुबईत खेळल्या जाणार्या या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहेच. परंतु सट्टा बाजारही गरम राहणार असून मोठी आर्थिक उलाढाल होण्याची चिन्हे आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, सट्टे बाजारात भारताचे पारडे जड असल्याचे सांगण्यात येत आहे. या सामन्यावर जवळपास एक हजार कोटींच्यावर सट्टा लावण्यात आला आहे. नाणेफेकीनंतर सट्ट्यावर लावण्यात येणारा पैसा वाढत जाण्याची शक्यता आहे. दुबईत सध्या मोठ्या प्रमाणात बुकींची उपस्थिती आहे. ऑनलाइन बेटिंग साइटसच्या माध्यमातून सट्टा लावला जात असून भारताचा दर ५८ रुपये सांगण्यात आला आहे. या साइट्स भारताच्या बाहेरून ऑपरेट केल्या जातात.
आयसीसी आणि बीसीसीआयचे भ्रष्टाचारविरोधी पथक सध्या दुबईत तळ ठोकून आहेत. त्यांचे प्रत्येक खेळाडूवर बारीक लक्ष आहे. खेळाडूंच्या सुरक्षेसह इतर गोष्टींवर आमचे अधिकारी नजर ठेवून आहेत, असे एका अधिकार्याने सांगितले. क्रिकेट सामना दुबईत होत असल्यामुळे गुन्हेगारी जगताचेही भारत-पाक क्रिकेट सामन्यावर लक्ष असेल. अंडरवर्ल्डमधील अनेक गुन्हेगारांना क्रिकेटचे वेड आहे. त्यांच्या माध्यमातूनही सट्टा लावण्यात येतो. सामन्यावर मोठा पैसा लावला गेल्यास सामना फिक्स्ड होण्याची दाट शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर आयसीसी आणि बीसीसीआयचे अधिकारी सामन्यावर बारीक लक्ष ठेवणार आहेत.