इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सांयकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत दोन सख्ख्या भावांसह पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाला. हे सर्व चिमूर तालुक्यातील कोलारी (सातगाव) गावाचे रहिवासी होते. धुलीवंदानंतर शनिवारी सुटी घालवण्यासाठी हे तलावावर आले होते.
या दुर्घटनेत यश गावंडे, अमित गावंडे, जनक गावंडे, तेजस गावंडे आणि तेजस ठाकरे यांचा मृत्यू झाला. यात दोन मुले ही चिमूर तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष विजय गावंडे यांचे बंधू माधव गावंडे यांची आहे. पाचही मृत साधारण २० ते २५ वयोगटातील होते. एकूण सहा जण पोहण्यासाठी उतरले होते. त्यातील एक जण बचावला.
या घटनेनंत काँग्रेस नेते विजय वडेड्डीवार यांनी सांगितले की, काळजाला चटका लावणारी ही घटना आहे. पाचही तरुणांच्या परिवारांसाठी ही अत्यंत वेदनादायक घटना आहे. या कठीण प्रसंगी संपूर्ण गावाच्या दुःखात सहभागी आहोत. भगवंत या पाच निष्पाप आत्म्यांना शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.