नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला आहे. त्याचा अनेक महिला आणि मुलांना फायदा होणार आहे. जर एखाद्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असेल आणि तिने दुसरे लग्न केले असेल तर पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला ती दुसऱ्या पतीचे नाव देऊ शकते, असा एक ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
ही घटना आंध्र प्रदेशातील आहे. येथे एका महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचा मुलगा केवळ अडीच महिन्यांचा होता. यानंतर महिलेने एअर फोर्समधील एका अधिकाऱ्यासोबत लग्न केले. आता प्रश्न हा होता की, पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचं काय? महिलेच्या पहिल्या पतीचे कुटुंबीय मुलाला स्वतःजवळ ठेवू इच्छित होते. तसेच ते नातवाला आपलं नाव लावू इच्छित होते. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं.
आजी-आजोबांपेक्षा आई मुलाची व्यवस्थित काळजी घेऊ शकते. त्यामुळे मुलगा त्याची आई आणि तिच्या दुसऱ्या पतीसोबत राहील असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाने पुढे असेही सांगितले की, मुलाला त्याच्या दुसऱ्या वडिलांचे नाव देता येऊ शकतं. हा महिलेचा अधिकार आहे. ज्यात ती आपल्या मुलाला दुसऱ्या पतीचं नाव देऊ शकते. यामुळे मुलगा आणि दुसऱ्या पती यांच्यामधील मुलं – वडिलांचं नातं चांगलं होईल.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले की, दुसरा पती मुलाला दत्तक घेऊ शकतो. मुलाच्या सर्व कागदपत्रांमध्ये त्याच्या दुसऱ्या वडिलांचे नाव असेल. कागदपत्रांमध्ये पहिल्या पतीचे नाव असल्याने मुलाच्या मनात अनेक प्रश्न उभे राहू शकतात. परिणामी हे मुलासाठी फायदेशीर ठरणार नाही.
Supreme Court Historic Decision Father Name to Children