मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीचा शिवसेनेतून बंडखोरी करुन गुवाहाटीत बसलेल्या एकनाथ शिंदे गटाला फायदा झाला आहे की शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात तज्ज्ञांचे मत आहे की, आजच्या सुनावणीने बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून ढाल मिळाली आहे.
न्यायालयाने बंडखोर गटाच्या १५ आमदारांच्या अपात्रतेच्या नोटिसांना ११ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. याशिवाय अविश्वास ठरावाबाबत कोणताही आदेश पारित करण्यास नकार दिला आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्र विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो, हे स्पष्ट झाले आहे. याशिवाय शिंदे गटाच्या आमदारांचे सदस्यत्व ११ जुलैपर्यंत अबाधित राहणार आहे. तसेच, विश्वासदर्शक ठराव झाल्यास त्यांच्या मताला महत्त्व येणार आहे. एकनाथ शिंदे गटाला पुढील १५ दिवसांसाठी मोठे संरक्षण कवच मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.
शिंदे गटाच्या आमदारांना उपसभापतींनी बजावलेल्या नोटिसाबाबतही सर्वोच्च न्यायालयाने सवाल केला आहे. शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचा परिणाम येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर दिसून येईल. महाराष्ट्र विधानसभेत फ्लोअर टेस्ट झाली तर हे आमदार आघाडीचा खेळ बिघडवू शकतात. अशाप्रकारे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीतून जो निकाल लागला आहे, तो उद्धव ठाकरे यांच्यासाठी निराशाजनक म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे गटही मैदानावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत यांनी आज ठाण्यात सभा घेतली आहे. यादरम्यान शिंदे समर्थकांनी संजय राऊत यांचा पुतळाही जाळला आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. शिंदे यांच्या मुलाने ही रॅली त्यांच्या घराजवळ नाही तर ठाण्यातील शिवसेनेच्या कार्यालयाजवळ काढली. मात्र, रॅलीचा दावा केला जात होता तितका मोठा नव्हता. वृत्तानुसार, येथे केवळ 200 लोक पोहोचले, परंतु संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या रॅलीत श्रीकांत शिंदे म्हणाले की, ‘संजय राऊत यांच्या बोलण्याने आम्हाला काही फरक पडत नाही. ते नेहमीच चित्रपट कथा बनवत असतात. आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही येथे आलो असून आम्हाला संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा पाठिंबा आहे.
शिंदे यांच्या अर्जावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने उपसभापतींच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या अर्जावर उपसभापती स्वत: न्यायाधीश कसे झाले, असा सवाल केला आहे. त्यावर उपसभापतींतर्फे उपस्थित असलेले अधिवक्ता राजीव धवन म्हणाले की, त्यांच्याविरुद्धची नोटीस एका व्हेरिफाईड नसलेल्या ईमेलद्वारे पाठवण्यात आली आहे.
supreme court hearing benefit rebel eknath shinde group or uddhav thackeray Maharashtra Politics