नवी दिल्ली – पती-पत्नी म्हणजे संसार रुपी रथाची दोन चाके होत. परंतु दोघांचे एकमेकांशी पटत नसेल तर प्रकरण अगदी कोणत्याही क्षणी घटस्फोटावर येते. मग लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तर म्हातारपणी देखील काही जोडीदारांचे घटस्फोट होताना दिसून येतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. मग प्रकरण अगदी सुप्रीम कोर्टात गेले.
लग्नानंतर केवळ पाच ते सहा दिवस एकत्र राहणाऱ्या आणि आता २६ वर्षापासून वेगळे राहणाऱ्या जोडप्याला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, जर तुम्ही एकत्र राहू शकत नसाल तर आता एकमेकांना सोडून जाणेच चांगले आहे. परंतु आता वयाच्या पन्नाशीनंतर तरी व्यवहारिक व्हा. तसेच उगीचच कोर्टकचेऱ्या मध्ये आपले आयुष्य वाया घालवू नका, असे देखील सुप्रीम कोर्टाने घटस्फोट देताना या पती-पत्नीला सुनावले आहे.
सुप्रीम कोर्टतील न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाने दिलेल्या घटस्फोटाच्या आदेशाविरोधात अपील करणाऱ्या महिलेला सांगितले की, तुम्ही व्यावहारिक व्हा, संपूर्ण आयुष्य न्यायालयात एकमेकांशी लढण्यात घालवता येणार नाही. तुमचे वय ५० वर्षे आहे आणि पती ५५ वर्षांचे आहेत. त्यामुळे खंडपीठाने या जोडप्याला कायमस्वरूपी देखभाल करण्याबाबत परस्पर निर्णय घेण्यास सांगितले आणि डिसेंबरमध्ये याचिकेवर विचार करण्याचे ठरवले.
यावेळी या महिलेच्या पतीच्या वकिलाने सांगितले की, १९९५ मध्ये लग्नानंतर त्यांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. वैवाहिक संबंध फक्त पाच-सहा दिवस टिकले. त्यामुळे विवाहाच्या या विघटनाच्या आधारावर घटस्फोटाला परवानगी देणे न्याय्य आहे. पतीला पत्नीसोबत राहायचे नाही पण तो तिची कायमस्वरूपी देखभाल करण्यास तयार आहे.
उच्च शिक्षित आणि श्रीमंत कुटुंबातून आलेल्या त्याच्या पत्नीने लग्नानंतर पतीच्या वृद्ध आई आणि बेरोजगार भावाला सोडून आगरतळा येथे राहण्यासाठी दबाव आणला. परंतु पतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा प्रयत्न केला. पत्नी सासरचे घर सोडून तिच्या माहेरी गेली. तेव्हापासून दोघेही वेगळे राहत आहेत.