नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाकडुन संयुक्तपणे शिष्यवृती प्रदान केली जाते. सदर संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज भरण्यासाठी अनु.जाती प्रवर्गासाठी २२ जानेवारी पर्यंत तर विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी दिनांक ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोविड-19 विषाणूच्या संसर्गामुळे काही महाविद्यालय बंद आहेत. ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम शिकवला जात आहे, त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहत नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर केले नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासुन वंचित राहु नये म्हणुन अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.
नाशिक विभागातील महाविद्यालयामंध्ये सन २०२१-२२ मध्ये प्रवेश घेतेलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तात्काळ https:// mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाइन सादर करावेत. विभागातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे नुतनीकरणाचे सर्व अर्ज ऑनलाइन प्रणालीतून अनु.जाती प्रवर्गासाठी दि.१७ जानेवारी २०२२ पर्यंत व विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत तसेच सन २०२१-२२ चे सर्व प्रवर्गाचे नवीन अर्ज दि.३१ जानेवारी २०२२ पर्यंत संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत असे आवाहन श्री भगवान वीर, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण नाशिक विभाग, नाशिक यांनी केले आहे.
सन २०२०-२१ मध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द संर्वगाचे नाशिक विभागात ६३ हजार अर्ज प्राप्त होते तर २०२१-२२ मध्ये आज अखेर फक्त १४ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच इमाव, विजाभज व विमाप्र संर्वगातील सन २०२०-२१ मध्ये नाशिक विभागात २ लाख १८ हजार अर्ज अर्ज प्राप्त होते तर २०२१-२२ मध्ये आज अखेर फक्त ५० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे येणा-या कालावधीत सर्व विद्यार्थांचे अर्ज भरुन घेण्याचे नियोजन समाज कल्याण विभागाकडून करण्यात येत आहे.
विद्यार्थानी शिष्यवृत्तीचे अर्ज वेळेत सादर केला नाही तर शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे, यासाठी प्रादेशिक उपायुक्त नाशिक विभाग नाशिक यांनी नुकताच आढावा घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थानी शिष्यवृत्तीचे अर्ज भरावेत यासाठी महाविद्यालयस्तरावर जनजागृती करण्याचे निर्देश विभागातील सर्व सहायक आयुक्त यांना दिले आहेत. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थापर्यंत पोहचण्यासाठी समाज माध्यमांचाही वापर करण्याचेही निर्देश दिले आहेत. आधार संलग्नीत युजर आयडी तयार करुन अर्ज भरलेले आहेत त्यांनी नवीन नॉन आधार युजर आयडी तयार करु नये असेही सुचित करण्यात येत आले असुन नाशिक विभागातील महाविद्यालयामंध्ये प्रवेश घेतेलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तात्काळ ऑनलाइन सादर करावेत असे आवाहन समाज कल्याण विभागाकडुन करण्यात आले आहे.