इंडिया दर्पण विशेष कथामाला – हस्ताक्षर – लेखकः ज्ञानेश सोनार
एका गावात सखूबाई आपल्या पाच वर्षांच्या मुलासह राहात होती. रामू मोठा चुणचुणीत व हुषार होता. एके दिवशी नदीवर पाणी भरावयास ती गेली असता रामूच्या वयाचा एक पोरगा तिला दिसला. उपाशी असावा. त्यास कुणी नव्हते. म्हणून तिने त्याला घरी आणले. त्यांचे नाव सदा होते. रामू व सदा हे भाऊ बनून आनंदाने राहू लागले.
शाळेत बरोबर जाऊ लागले हळू काळ मागे पडला. मुले मोठी झाली सदा हुशार होता, पण वांड प्रवृतीचा होता. चौदा पंधरा वर्षांचा झाला असेल नसेल तो एक दिवस न सांगता घरातून पळून गेला. सखूबाईने जवळपास शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्याच्या आठवणीने सारखी रडवेली होई, पण रामू समजूत घाली. काही वर्ष गेली रामू आता मोठा झाला. त्याने इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली. स्कॉलर असल्याने त्याचे खूप कौतुक झाले.
एके दिवशी एका मोठ्या कंपनीत मॅनेजरच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात आले होते. रामू व त्याची आई दोघे कंपनी शोधत शहरातल्या कंपनीत पोहोचले. अनेक तरुण मुले अर्ज घेऊन आलेले होती. जेथे अर्ज स्वीकारले जात होते तिकडे हे निघाले. जाता जाता सखूने सहज काचेतून पलीकडे पाहिले तो काय तेथे डायरेक्टरच्या खुर्चीवर सदा बसलेला होता. टाय, सूट कोट घालून. पोटच्या पोरासारखेच सदाला तिने वाढवले होते. सदाला तेथे पाहून तिला खूप हायसे वाटले. दारावरच्या शिपायास सांगून ते दोघे सदाच्या प्रशस्त ऑफिसमध्ये गेले. मात्र सदा पूर्ण बदलला होता. त्याने ढुंकूनही त्यांची दखल घेतली नाही. उलट अनोळखी नजरेने रागाने वर पाहिले.
त्याच्या चेह-यावर कोणतेही ओळखीचे भाव नव्हते. ‘काय पाहिजे’? त्याने उद्धपणे विचारले. ओळख दाखवायची त्याची इच्छा नाही, हे सखुबाईच्या लक्षात आले. सावरुन ती म्हणाली, ‘साहेब माझा मुलगा रामू इंजिनीयरींग फर्स्ट क्लासमध्ये झाला आहे. आपल्या कंपनीत मॅनेजरची जागा खाली आहे. म्हणून मी व रामू अर्ज घेऊन आलो आहोत. जर गुणवत्तेत तो पास झाला तर त्याला नोकरीस ठेवा, ही विनंती. आपले फार उपकार होतील !” ठेवा तो अर्ज टेबलावर. तो लायक असेल तर नोकरीचं बघू.. निघा आता!
बिझी असल्यागत मान वर न करता तो काम करू लागला.” धन्यवाद साहेब, येतो आम्ही. असं म्हणत अत्यंत दु खी मनाने सखुबाई व रामू ऑफिस बाहेर पडले. सदाचा संताप झाला होता. ओळख काढून उगाचच लोक त्रास देतात, हरामखोर! असे म्हणत त्याने रामूचा अर्ज टराटरा फाडून टोपलीत टाकला. जराशाने त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, त्याने चिटोरे एकत्र केले व त्याचा अर्ज स्वहस्ते लिहून काढला व सिनियर मॅनेजरला बोलावून म्हणाला, हा एक अर्ज जरा पहा योग्य वाटल्यास या उमेदवारास इंटरव्ह्य़ूला बोलावून घ्या.
आठ-पंधरा दिवसांनी सदास रामूच्या अर्जाची आठवण झाली. मॅनेजरला बोलावून त्याने विचारले,’ मी एक अर्ज आपणास दिला होता त्याचे काय झाले? त्यास आपण नोकरी दिली का. त्याचा इंटरव्ह्यू कसा झाला? मॅनेजर काही काळ नि:स्तब्ध झाले. व म्हणाले, “सर, आपण म्हणता तो कँडिडेट जस्ट जीनियस होता. आलेल्या शंभर मुलांमध्ये अत्यंत गुणवान, हुशार, चारित्र्यवान, सद्गुणी वाटला. त्याची बुद्धिमत्ता अत्यंत तीव्र होती. तसाच अत्यंत समजदार व सालस होता.” समजलं पुढे.. त्यास नोकरी दिली का? ”
नाही सर, नाही दिली नोकरी!” का? कारण काय? सदाने चमकून मॅनेजरला विचारले. मॅनेजर म्हणाले,”सर मी हस्ताक्षर तज्ज्ञ आहे. ज्या वेळी मी त्या मुलाचा अर्ज व त्यावरील हस्ताक्षर पाहिले, मात्र अक्षरावरून ताे मला तुसडा, क्रूर, उद्धट, हरामखोर, व्यसनी वाटला. उपकार करणारांची जाणीव न ठेवणारा अपकारी वाटला. प्रश्न कंपनीच्या हिताचा होता म्हणून मी त्यास नोकरीवर ठेवलेले नाही. सदा सुन्न झाला. जराशाने मॅनेजरला म्हणाला, “त्याची अपाॅईंटमेंट ऑर्डर तयार करा व मला इकडे आणून द्या!”