मुंबई – इयत्ता दहावीचा निकाल लागला असला तरी या निकालात शिक्षण मंडळच नापास झाल्याची बाब समोर येत आहे. वेबसाईट न उघडणे, सर्व्हर डाऊन, वेबसाईट क्रॅश अशा प्रकारांमुळे विद्यार्थी व पालक प्रचंड हैराण झाले आहेत. त्यामुळेच अद्यापही विद्यार्थ्यांना निकाल पाहता आलेला नाही. अनेक तास होऊनही निकाल दिसत नसल्याच्या गंभीर तक्रारी येऊ लागल्याने अखेर याची दखल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना घ्यावी लागली आहे. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यंदा कोरोना संसर्गामुळे परीक्षा झाल्या नाहीत. त्यातच आता निकाल लागला तर तो बघता येत नाही आणि पुढील शैक्षणिक प्रवेशाचे काय, असे असंख्य प्रश्न विद्यार्थी व पालकांसमोर उपस्थित झाले आहेत. राज्य बोर्डाकडून आज दुपारी १ वाजता निकाल जाहिर करण्यात आला. मात्र, विद्यार्थी व पालकांना हा निकाल पाहता येत नसल्याच्या प्रचंड तक्रारी आहेत. त्यामुळे घराघरातून नाराजीचा सूर आहे. यंदा परीक्षा झाली नाही आणि त्याचा निकाल लागला तरी या सर्व प्रक्रियेत राज्य शिक्षण मंडळच नापास झाल्याचे पालकांकडून बोलले जात आहे. तर, थोड्याच वेळात वेबसाईट सुरळीत होईल, असे मंडळाकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात अद्यापही विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळालेला नाही.
आज काही तांत्रिक बाबींमुळे शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दहावीचा निकाल प्राप्त होण्यास अडथळे निर्माण झाले. त्याबद्दल आम्ही दिलगिर आहोत. सदर प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल; जेणेकरून घडल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये.#sscresults pic.twitter.com/C6K77tbnSZ
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) July 16, 2021