गुवाहाटी (आसाम) – कोणत्याही कामाच्या ठिकाणी सहा दिवस काम केल्यानंतर एक साप्ताहिक सुट्टी असते. म्हणजे आठवड्याला प्रत्येकाला एक सुट्टी नक्कीच मिळते. शासकीय कर्मचाऱ्यांना तर रविवारची साप्ताहिक सुट्टी ठरलेलीच असते. परंतु त्याशिवाय शासकीय कर्मचारी असो की खासगी कंपन्यांमधील कामगार त्यांना विविध प्रकारच्या रजा देखील मिळतात. मात्र, आता आई-वडिलांना कर्मचाऱ्यांनी वेळ द्यावा म्हणून त्यांना चक्क विशेष रजा देण्याचा निर्णय आसाम सरकारने घेतला आहे.
सुट्टी किंवा रजा देण्याचे मुख्य कारण म्हणजे कोणतेही काम करताना त्या व्यक्तीस आलेला मानसिक आणि शारीरिक थकवा दूर करण्यासाठी काही काळ विश्रांती आवश्यक असते. आणि ही विश्रांती फक्त सुट्टी किंवा रजेच्या दिवशी मिळू शकते. त्याचप्रमाणे रजा देण्याचा मुख्य उद्देश म्हणजे त्या व्यक्तीच्या काही अत्यावश्यक कामासाठी त्याला वेळ देणे गरजेचे असते. काही कामे ही तातडीची किंवा आणीबाणीची निघू शकतात. तर काही कामे ही दीर्घकालीन देखील प्रलंबित असल्याने सुटीच्या काळात ही कामे करणे शक्य होते. परंतु या सर्वांमध्ये मुख्य गोष्ट म्हणजे सुट्टी केव्हा रजेच्या काळात कुटुंबाला वेळ देणे होय.
परंतु बहुतांश ठिकाणी सुटीवर किंवा रजेवर असतानादेखील कुटुंबाला अनेक जण कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. तर काहीजण आपल्या जन्मदात्या आई वडीलांना देखील वेळ देऊ शकत नाही, परंतु आता या गोष्टी लक्षात घेऊन आसाम मधील सरकारने एक आगळा वेगळा आणि चांगला निर्णय घेतला आहे. आसाममधील सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी जानेवारीमध्ये त्यांच्या पालकांसोबत वेळ घालवण्यासाठी दोन अतिरिक्त सुट्या देण्यात येणार आहेत. पण ते कर्मचारी त्याच कामासाठी या सुट्या वापरतील हे ध्यानात ठेवावे लागेल.
या नव्या उपक्रमाची घोषणा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केली. येत्या जानेवारी महिन्यात ६ आणि ७ तारखेला ही सुट्टी उपलब्ध असेल, कारण ८ तारखेला शनिवार आणि ९ तारखेला रविवार आहे. अशा प्रकारे एकूण चार सुट्ट्या या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.
या निर्णयाची घोषणा करताना सरमा म्हणाले की, यामुळे राज्याच्या कामकाजात चांगला आणि सकारात्मक फरक पडेल याची मला खात्री आहे. कारण सगळे फ्रेश होऊन येतील. नवीन वर्षात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या पालकांसोबत वेळ घालवला आणि आशीर्वाद मिळवले तर मला नक्कीच आवडेल, असेही ते म्हणाले.