श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला
: क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-२८
पाँडिचेरीला प्रयाण
श्रीअरविंद घोष हे ईश्वरी आदेशानुसार चंद्रनगर येथे पोहोचले होते. एक-दीड महिन्याच्या वास्तव्यानंतर, तशाच प्रकारच्या आणखी एका प्रयाणाच्या ‘आदेशा’नुसार, त्यांनी चंद्रनगर सोडले आणि S.S. Dupleix नावाच्या जहाजाने (सोबत छायाचित्र आणि इन्सेट मध्ये श्रीअरविंद) दि. ०१ एप्रिल रोजी द्वितीय श्रेणीमधून प्रवासास निघाले. ब्रिटिशांना त्यांच्या प्रयाणाचा सुगावा लागू नये, म्हणून त्यांचे वेगळ्याच नावाने तिकीट काढण्यात आले. प्रवासासाठी खासगी कक्षाची तिकिटे काढण्यात आली. गंतव्य ठिकाणही पाँडिचेरी न सांगता कोलोम्बो सांगितले, ते दिशाभूल करण्याच्या हेतूनेच ! अशा रीतीने दि. ४ एप्रिल १९१० रोजी श्रीअरविंद घोष पाँडिचेरीला येऊन पोहोचले…
या पाँडिचेरी प्रयाण आदेशांविषयी खुलासा करताना ते अन्यत्र म्हणतात — ”….मी केवळ माझ्या आंतरिक मार्गदर्शकाचेच आदेश मानत आलो आणि ‘ईश्वरा’च्या मार्गदर्शनानेच वाटचाल करत आलो. कारावासात असताना माझी जी आध्यात्मिक प्रगती झाली होती त्यानंतर तर तो माझ्या अस्तित्वाचा एक निरपवाद नियमच बनून गेला. मला जो आदेश प्राप्त झाला त्यानुसार आज्ञापालन करून, त्वरित कृती करणे मला आवश्यकच होते.”
पाँडिचेरीला आल्यानंतरही, ‘कर्मयोगिन्’मधील To my countrymen या त्यांच्या लेखाबद्दल त्यांना अटक करण्याचे वॉरंट निघाले पण ते लिखाण राष्ट्रद्रोही नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आणि वॉरंट मागे घेण्यात आले. ब्रिटिशव्याप्त भारताच्या हद्दीतून त्यांच्या निघून जाण्याने बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते. आणि म्हणून, आपण कोठे आहोत, कोणत्या कारणासाठी पाँडिचेरीला आलो आहोत आणि आता राजकारणाशी आपला संबंध कसा नाही याचे कथन करणारे जाहीर निवेदन त्यांनी सुप्रसिद्ध ‘द हिंदू’ (मद्रास) या वृत्तपत्रातून दि. ०८ नोव्हेंबर १९१० रोजी प्रकाशित केले.
पुढे अनेक वर्षानंतर श्रीअरविंद घोष यांनी आपल्या पाँडिचेरीला येण्याचे कारण स्वत: एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. त्यात ते लिहितात — “एका निश्चित उद्दिष्टासाठी मला मोकळीक आणि स्थिरचित्तता हवी होती म्हणून मी पाँडिचेरीला आलो, त्या उद्दिष्टाचा वर्तमान राजकारणाशी काही संबंध नाही – माझ्या येथे येण्यानंतर मी राजकारणामध्ये थेट सहभागी झालेलो नाही, आणि असे असूनसुद्धा मला माझ्या पद्धतीने या देशासाठी जे करता येणे शक्य होते ते मी कायमच करत आलो आहे – माझे ते उद्दिष्ट (योगसाधना) पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत कोणत्याही सार्वजनिक कृतिकार्यक्रमात पुन्हा सहभागी होणे मला शक्य होणार नाही. पाँडिचेरी ही माझ्या तपस्येची गुहा आहे; हे माझ्या आश्रमाचे स्थान आहे, हा आश्रम संन्यासमार्गी प्रकारचा नाही तर, माझ्या स्वतःच्या शोधामुळे त्याचा स्वतःचाच असा एक वेगळा ठसा निर्माण झाला आहे. मी (पाँडिचेरी सोडून) परत निघण्यापूर्वी मला माझे ते कार्य पूर्ण केलेच पाहिजे, आणि त्या दृष्टीने स्वत:ला आंतरिकरित्या सक्षम आणि सुसज्ज झालेच पाहिजे.”
(क्रमश:)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShreeArvind Part28