श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला:
क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-२६:
चंद्रनगरला साधना सुरू
(चंद्रनगरला केलेल्या प्रस्थानाची श्रीअरविंद घोष यांनी स्वत: सांगितलेली हकिकत…)
पोलिस खात्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून मला अशी माहिती मिळाली की, दुसऱ्या दिवशी माझ्या कार्यालयावर छापा घातला जाणार आहे आणि मला अटक करण्यात येणार आहे; ही माहिती मिळाली तेव्हा मी ‘कर्मयोगिन’च्या कार्यालयात होतो. (नंतर खरोखरच कार्यालयावर छापा घालण्यात आला पण माझ्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले नव्हते; तत्पूर्वीच पाँडिचेरीला जाण्यासाठी मी चंद्रनगर सोडले होते.)
ही घटना घडण्यापूर्वी, मी माझ्या आजूबाजूला यासंबंधी काही तावातावाने चर्चा, शेरेबाजी चाललेली ऐकत होतो तेव्हाच आकस्मिकपणे मला वरून एक आदेश आला; तो आवाज माझ्या परिचयाचा होता, तीन शब्दांमध्ये तो आदेश देण्यात आला होता, “चंद्रनगरला जा.” अवघ्या दहापंधरा मिनिटांमध्ये चंद्रनगरला जाणाऱ्या बोटीत मी बसलो होतो. बागबजार किंवा इतरत्र कुठेही न जाता, मी तडक माझा नातेवाईक बिरेन घोष आणि मणी (सुरेशचंद्र चक्रवर्ती) यांच्यासमवेत चंद्रनगरला जाण्यासाठी बोटीवर चढलो, रामचंद्र मुजुमदार यांनी घाटाकडे जाण्याचा मार्ग दाखविला आणि तेथूनच त्यांनी आम्हाला निरोप दिला.
आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा अजून अंधारच होता; ते लगेचच सकाळी कलकत्त्याला परतले. मी तेथे गुप्तपणे माझ्या साधनेमध्ये निमग्न राहिलो आणि दोन वृत्तपत्रांबरोबर (कर्मयोगिन् आणि धर्म ही दोन साप्ताहिके) असलेला माझा सक्रिय संपर्क त्या क्षणापासून संपुष्टात आला.
(क्रमश:)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShreeArvind Part26