श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला:
क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-१९:
अनुभूती
श्रीअरविंद घोष यांना काही आध्यात्मिक अनुभव आलेले होते, पण योग म्हणजे काय? किंवा त्यासंबंधी काहीही शास्त्रीय माहिती नसताना आलेले ते अनुभव होते. उदाहरणार्थ, दीर्घ काळानंतर परत भारताच्या भूमीवर, मुंबई येथील अपोलो बंदरावर पहिले पाऊल ठेवताच आलेला ‘शांतीच्या अवतरणा’चा अनुभव; श्रीशंकराचार्यांच्या टेकडीवरून (तख्त-ए-सुलेमानच्या पर्वतरांगेवरून) फिरत असताना त्यांना झालेला शून्य अनंताचा साक्षात्कार; नर्मदाकाठी चांदोद येथील देवळात, श्रीकालीच्या जिवंत उपस्थितीचा आलेला अनुभव; ….पण हे सारे आंतरिक अनुभव आपणहून, अनपेक्षितपणे आले होते; तो साधनेचा भाग नव्हता.
श्रीअरविंदांनी स्वत:हून कोणाच्याशी मार्गदर्शनाविना साधनेला सुरुवात केली. त्यांचा एक मित्र हा नर्मदेच्या किनाऱ्यावरील स्वामी ब्रह्मानंदांचा शिष्य होता, श्रीअरविंदांनी त्याच्याकडून काही नियम समजावून घेतले. सुरुवातीला ही साधना प्राणायामाच्या अभ्यासापुरतीच सीमित होती. श्रीअरविंदांनी जेव्हा योगसाधनेला सुरुवात केली तेव्हा योगसाधना व राजकारण यामध्ये कोणताही विरोध वा द्वंद्व नव्हते. या दोहोंमध्ये काही विरोध आहे अशी कल्पनाही त्यांच्या मनाला न शिवता त्यांची साधना चालू होती…
पण ते या क्षेत्रातील मार्गदर्शकाच्या शोधात होते. त्या त्यांच्या शोधाच्या दरम्यान त्यांची एका नागा संन्यासाशी गाठभेट झाली. या नागा संन्याशाने काही मंत्र पुटपुटत, ग्लासमधील पाण्यामध्ये सुरीने छेद देत, जे पाणी अभिमंत्रित केले होते त्या पाण्यामुळे बारीन्द्र घोष यांचा (श्रीअरविंदांचे धाकटे बंधू) गंभीर ताप क्षणार्धात बरा झालेला पाहून योगशक्तीवरचा श्रीअरविंद घोष यांचा विश्वास वाढीस लागला तथापि त्यांनी त्या नागा संन्याशाला गुरु मानले नाही. स्वामी ब्रह्मानंदांनादेखील श्रीअरविंद भेटले आणि त्यांच्यामुळे ते खूप प्रभावितही झाले पण पुढे महाराष्ट्रातील एक योगी श्री. विष्णू भास्कर लेले यांची (सोबत छायाचित्र) भेट होईपर्यंत श्रीअरविंदांना गुरु म्हणून किंवा साहाय्यक म्हणून कोणीही भेटले नव्हते.
(क्रमश:)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShreeArvind Part19