नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना निवडणूक
१९५५ साली अनौपचारिकरित्या आणि १९७२ पासून अधिकृतपणे स्थापन झालेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांची दर तीन वर्षांनी होणारी निवडणूक १९८७ पर्यंत बिनबोभाट आणि चर्चेविना होत असे. पण त्यानंतर मात्र नाशिकमधील क्रिकेट हवे तसे वाढले नाही , नाशिकमधील खेळाडू चांगले खेळूनही महाराष्ट्राकडून रणजी संघात घेतले जात नाही आणि खेळाडूना हव्या तशा सुविधा ( मुख्यतः टर्फ विकेट इ )मिळत नाही अशा रास्त तक्रारी येउ लागल्या आणि खेळाडूसह दत्ता आहेर , अशोककुमार पाटील , शशांक सामंत , बंबुशेट जैन, प्रभाकर लोणारी इ च्या पुढाकाराने क्रिकेटशौकीन एकत्र आले आणि त्यांनी ना जि क्रि संघटनेला सदस्य संख्या मोजक्या निवडक १०० वरुन ७०० पर्यंत वाढवण्यासाठी माफक संघर्ष करून भाग पाडले आणि नाशिकचे क्रिकेट कायमचे पण चांगल्यासाठी बदलले.
संघटनेत नवे तरुण आणि खेळलेले पदाधिकारी आले . त्यांनी नवे विचार, आधुनिक योजना आणि सुविधा आणल्या. तथापि डॉ पुराणीक , व्हि पी बागूल आणि त्यांच्या सहकार्यांनी नाशिकमधील क्रिकेट सुमारे तीन दशके आपल्या परीने जिवंत ठेवले ही मान्य केलेच पाहिजे. नाशिकमधील क्रिकेटने त्यानंतर मोठी उडी घेतली ती २००३ मध्ये विनोद शहा आणि त्याच्या साथीदार यानी संघटनेचा कारभार हाती घेतल्यानंतर आणि त्याचवेळी महाराष्ट्र क्रिकेट संघटना अजय शिर्के यांच्या (संघर्ष करुन) ताब्यात आल्यावर.
महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेत आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या संघात नाशिकला न्याय्य स्थान मिळाले. फक्त पुण्यातील खेळाडू संघात घेण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद झाली. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या समित्यांवर महत्त्वाच्या पदांवर नाशिकला सातत्याने स्थान मिळत गेले तर गुणवत्ता असलेले सत्यजित बचछाव, माया सोनावणे, ईश्वरी सावकार इ सारखे खेळाडू राज्याच्या संघात आणि पुढे विभागीय तसेच Challenger सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत खेळताना दिसत आहेत . हे केवळ येथे जिल्हा संघटनेने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा आणि संधी याचे फळ आहे हे मान्य केले पाहिजे.
सर्व वयोगटातील सर्व सामने गेल्या १५ वर्षे टर्फ विकेटवर आणि वर्षभर सुमारे ४०० च्या आसपास सामने तेही ३ ते ४ मैदानावर तसेच वर्षभर चालणारे कोचिंग Camps अशा व्यावसायिक पध्दतीने संघटना काम करते आहे . हे करण्यासाठी लागणारे भरभक्कम आर्थिक पाठबळ संघटनेने लाइफ मेंबर्स वाढवून आणि काही क्रिकेटप्रेमी हितचिंतकांच्या पाठिंब्यावर तसेच स्थानिक सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या मदतीने उभे केले आहे. पुण्याखालोखाल नाशिक हे महत्वाचे क्रिकेटकेंद्र म्हणून मानले जाते कारण नाशिकमध्ये २००५ पासून २०१९ तब्बल १२ रणजी सामने , राज्य संघटनेचे आंतरजिल्हा सामने आणि बी सी सी आय चे अनेक सामने भरविण्याची जबाबदारी राज्य संघटनेने ना जि संघटनेचे काम आणि अनुभव पाहूनच दिली असणार.
तर अशा संघटनेची पुढील तीन वर्षांची कार्यकारिणी निवडून देण्यासाठी निवडणूक शनिवारी (९ एप्रिल) होत आहे आणि त्यासाठी २७६० आजीव सदस्य आणि ६२ रजिस्टर्ड संस्थाचे प्रतिनिधी असे जाणकार मतदार मतदान करतील आणि त्यांना नाशिकच्या क्रिकेटच्या हिताची चिंता असल्याने ते योग्य व्यक्ती आणि पॅनललाच मत देतील यात शंका नाही.