इंडिया दर्पण विशेष लेखमाला – दिगंबरा दिगंबरा
श्री दत्त जन्मकथा
दत्तात्रयांपासून निर्माण झालेला दत्त संप्रदाय अति प्राचीन असून देशभर दत्तात्रयांची अनेक मंदिरं आणि तीर्थस्थानं प्रसिद्ध आहेत. देवी ,श्रीराम आणि खंडेराव महाराज यांच्या प्रमाणेच गुरुदेव दत्तांचे देखील नवरात्र साजरे केले जातात. यावर्षी दि. १० ते १९ डिसेंबर या कालावधीत श्री दत्त नवरात्रोत्सव संपन्न होत आहे. यानिमित्ताने इंडिया दर्पणच्या वाचकांना भारतातील सुप्रसिद्ध दत्त स्थानांचा परिचय करुन देण्याचा संकल्प केला आहे. श्री दत्त नवरात्रोत्सवानिमित्त अशा प्रकारची लेखमाला मराठीत प्रथमच सादर केली जात आहे. ‘इंडिया दर्पण’ च्या वाचकांना ती पसंत पडेल अशी आशा आहे.

मो. ९४२२७६५२२७
श्री दत्तजन्म कथा
अत्रिमुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमांत पतीच्या सान्निध्यांत राहून पतीची उत्तम प्रकारे सेवां करित असे. तसेच आश्रमांत येण्याऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी. वेळीअवेळी आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमांतून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्तहस्तानें गेला नाहीं. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यसुद्धां तिला भिऊन वागे; अग्नि तिच्यापुढें शीतल होई; पवन तिच्यापुढे नम्र होई. तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिचपुढे थरथर कापत. एवढा तिच्या पतिव्रत्याच्या प्रभाव!
पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दलअसलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नांव ‘साध्वी व पतिव्रता स्त्री’ म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता अर्थात् नारदुमुनींच्या सुद्धा कानांवर गेल्या शिवाय राहिली नाही. नारदांचे नांवच मुळी’ कळीचा नारद ‘ तेव्हां ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला (विष्णूची पत्नी) सांगितली, पार्वतीपुढे (शंकराची पत्नी) अनुसूयेच्या पतिव्रत्याचे गुणगान गाइले, सावित्रीपुढे (ब्रह्मदेवाची पत्नी) तिच्या आदरातिथ्याविषयी धन्योद्गार काढले. तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनुसूया यःकिंचित् मानव व आपण देवी. तेव्हा या अनुसूयेचे वर्चस्व आपणांवर उपयोगी नाहीं. तेव्हां हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनांत विचार आला आणि हा विचार त्यांनीं आपापल्या पतीजवळ बोलून दाखविला. तेव्हां त्यात्रैमूर्ति (ब्रह्मा-विष्णु-महेश) क्रोधाने संतप्त झाल्या आणि म्हणाल्या- “ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पहातो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो.” अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्युलोकांत यवयास निघाले.
त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातांत कमंडलू अशा थाटांत ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमांत आले. भर दुपारची वेळ ! ऊन मी म्हणत होते. अशा वेळीं आपल्या आश्रमांत आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले.
पण तिला अतिथी म्हणाले- “आम्ही लांबून आलो असून, तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हांस इच्छा झाली आहे की, तू नग्न होऊन आम्हांस अन्न वाढावे. हे वचन ऐकतांच अनुसूया चिंतन करीत मनांत म्हणाली- ‘हे कोणी साधे पुरुष माझे सत्त्व पाहण्याकरिता आले असावे. यास जर विन्मुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझें मन निर्मळ आहे. शिवाय माझ्या पतीचें तपःसामर्थ्य माझ्यामागे आहे.’ असे मनांत आणून सती म्हणाली, “थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणेच करते.” एवढे बोलून अनुसूया तात्काळ घरात गेली. त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यास ही सारी कथा निवेदन केली. तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रांत गंगोदक देऊन म्हणाले, “हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छाभोजन दे. त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले.
तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे ती तीर्थाची पंचपात्री हातीं घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली, हातांतील गंगोदक त्या तिघांवर उडविलें. तो काय? त्या गंगोदकाचा स्पर्श होतांच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले. लहान बालक! अगदीं लहान! तीं तीन गोजिरीं गोजिरीं बालकें पायांजवळ लोळूं लागलीं. तेव्हां अनुसूयेनें तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतलें. अशा तर्हेने गंगोदक उडविल्यावर त्या तिघां अतिथींची बालकें झाली ती बालके रडू लागली. तेव्हां त्यांना भूक लागली असेल असें समजुन अनुसूयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले. त्यांची क्षुधा निवारण केली व त्यांना पाळण्यांत घालून थोपटून निजविलें. असें या पतिव्रत्याचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली. पण हीं तिन्ही बालके. मात्र आहेत त्याच स्वरूपांत राहिली.
असे होता होता एकदां नारदमुनीचीं स्वारी अत्रिमुनींच्या आश्रमांत आली. मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले तेव्हां त्यांच ठिकाणीं ती तीन बालके ( ब्रह्मा-विष्णु-महेश ) रांगत खेळत असतांना नारदांनी पाहिली. नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले, पण तेथे ते कांहीच बोलले नाहींत. अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकीं आले व ही गोष्ट त्यांनीं लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या.
तेव्हां त्या तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की, ‘हे मुनिवर, आम्हांला त्या अत्रिमुनींच्या आश्रमांत घेऊन चला. म्हणजे आम्ही आपापले भ्रतार (पति) परत शोधून घेऊन येऊं. तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्रिमुनींचा आश्रम दाखविला. इकडे या तिघी त्या अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकुन झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली. तेव्हा त्या अनुसूयेस दया येऊन तिनें हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हां अत्रिमुनींनी फिरून गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातांत तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्ववत् देवस्वरूप झाली.
ब्रह्मा- विष्णु- महेश. इतक्यांत मुनि बाहेर आले. त्यांनीं देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी विष्णु, शंकर, ब्रह्मदेव, प्रसन्न झाले व म्हणाले, “हे अनुसूये आम्ही तुजवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग !” तेव्हां अनुसूयेने ‘तिघे बालक (ब्रह्मा – विष्णु- महेश) माझ्या घरीं तीन मूर्ति एकरूप होऊन पुत्राप्रमाने राहूं देत’ असा वर मागितला. तेव्हा ‘तथास्तु’ असें म्हणून देव अंतर्धान पावले. आणि बालक रूपातील दत्तात्रेयाचा अत्रि आश्रमात, मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी जन्म झाला. तीन शिरें, सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचें ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय! तेव्हांपासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकालीं दत्ताच्या देवालयांत दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. श्री क्षेत्र गाणगापूर येथे हा जन्म सोहळा दुपारी १२ वाजता केला जातो. काही क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा होतो.
(संदर्भ : धार्मिक पुस्तके, काही संकेतस्थळे व विकिपीडिया)