पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सामाजिक कार्यकर्त्या, अनाथांच्या माता आणि पद्मश्री सिंधुताई सपकाळ (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचे हार्नियाचे ऑपरेशनही झाले. थोड्याच वेळापूर्वी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
सिंधुताई यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले होते. अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी ममता बाल सदन ही संस्था सुरू केली. १९९४ मध्ये त्यांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर जवळील कुंभारवळण या गावात या संस्थेचे कार्य सुरू केले. तेथे त्यांनी अनेक अनाथ मुलांचा सांभाळ सुरू केला. कुठल्याही सरकारी मदतीशिवाय त्यांनी या संस्थेला नावारुपास आणले. खासगी संस्था आणि व्यक्तींच्या देणगीद्वारे संस्थेने कार्याचा मोठा विस्तार केला. याद्वारे शेकडो अनाथांना हक्काचे घर आणि माय मिळाली. या मुलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. या अनाथांचे विवाह लावून देण्याचे कामही त्यांनी केले. त्यांनी जवळपास ५ ते ६ संस्थांद्वारे भरीव सामाजिक कार्य केले. केंद्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाने अनेक अनाथांची माय आज अनंताच्या प्रवासाला गेली आहे. विविध क्षेत्रातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.