सिन्नर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त पन्नास भाविकांच्या उपस्थितीत यात्रा होईल, असे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र यात्रेकरूंनी हजारोंच्या संख्येने गर्दी करून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याचा चित्र वडांगळी येथील सतीमाता-सामतदादा यात्रेत दिसून आले. वर्षानुवर्षे येथील भाविक हजारो किलोमीटरवरून वडांगळी येथील यात्रेत सामील होत असतात. सतीमाता-सामतदादा बंजारा भाविकांचे श्रद्धास्थान असून माघ पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येथे नतमस्तक होतात. बोकडबळीची यात्रा म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रा भरली नव्हती. मुसळगाव एमआयडीसी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. यात्रा भरणार नाही असे प्रशासनाने आवाहन केले होते. त्यामुळे दोनचार पोलीसच उपस्थित होते. मुसळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी यांनी यात्रेत भाविकांनी कोरोनाचे नियम पाळण्याचे तसेच उघड्यावर पशुबळी न देण्याचे आवाहन केले. प्रशासनाने यात्राबंदी केल्याचे तसेच पन्नास भाविकांच्या उपस्थितीत परवानगी देऊन सुद्धा हजारोच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावल्याने प्रशासन तसेच पोलीस हतबल झाल्याचे दिसून आले.
गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून अंनिस बोकडबळी, पशुहत्या विरोधात लढा देत असल्याचे अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे यांनी सांगितले. जिल्हा अंनिसचे कार्याध्यक्ष अॅड. समीर शिंदे, तालुकाध्यक्ष डॉ. श्यामसुंदर झळके, उपाध्यक्ष हरिभाऊ तांबे, बजरंग दलाचे बंजारा नेते इंदल चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष समीर शिंदे, प्रा.आशा लांडगे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, हरिभाऊ तांबे, राजेंद्र मिठे, बाबासाहेब कलकते, राजेंद्र भावसार, श्याम गोसावी, प्रा. गंगाधर अहिरे, प्राचार्य दिनकर पवार आदी उपस्थित होते.
अंनिसचे प्रथेविरोधात प्रबोधन
सतिमाता देवीच्या प्रांगणात नाशिक जिल्हा तसेच सिन्नर तालुका अंनिसच्या वतीने प्रबोधनात्मक फलक लावून उपस्थित बंजारा भाविकांना अनिष्ट प्रथा, परंपरा बंद करून बोकडबळी देऊ नये यासाठी आवाहन केले. तसेच वडांगळी येथील माध्यमिक व उच्च मध्य विद्यालयाच्या स्काऊटच्या पथकाने मोफत चरणसेवा प्रदान करून बंजारा भाविकांचे प्रबोधन करून अंनिसच्या कार्यात सहभागी झाले. या उपक्रमाचे पोलिसांनी स्वागत केले.
मुखवट्यांसह काठीची मिरवणूक
सायंकाळी सतीमाता सामतदादा यांच्या मुखवट्यांसह काठीची मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बुधवारी पौर्णिमा असल्याने रात्री उशिरापर्यंत भाविक येत होते. गुरुवारी यात्रेचा दुसरा दिवस आहे. शुक्रवार भाविकांची जादा गर्दी होण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायतीतर्फे शुद्ध पाणी
न्यू इंग्लिश स्कूलच्या स्काऊट-गाइड पथकाच्या वतीने यात्रा परिसरात सहाय्यता कक्ष उभारला होता. भाविकांकडून देवीला गोड शिर्याचा तर सामतदादास खारा नैवेद्य दाखवला जात होता. ग्रामपंचायतच्या वतीने भाविकांना दहा रुपये शुल्क आकारून २० लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करण्यात आले.