इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा मोठे धक्के बसू लागले आहे. कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला रामराम केला असतांना आता दिल्लीत ठाकरे गटाचे ६ खासदार हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा पुन्हा जोरात सुरु झाली आहे. ऑपरेशन टायगर म्हणून ही मोहिम सुरु करण्यात आली असून त्यात शिंदे गटाला यश आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तातडीने ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे दिल्लीला गेले आहे.
पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाई टाळण्यासाठी दोन तृतीयांश खासदारांचा गट वेगळा होऊन बाहेर पडण्याची गरज आहे. ठाकरे गटाकडे एकुण नऊ खासदार आहेत. त्यामुळे पक्षातून बाहेर पडण्यासाठी सहा खासदारांची गरज आहे. या नऊ पैकी अनिल देसाई व अरविंद सावंत हे शेवटपर्यंत ठाकरे गटाकडे राहतील, पण, उर्वरीत खासदार हे शिंदे गटात जाऊ शकतात. त्यामुळे जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्या आहे.
शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यात ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर त्याठिकाणी पोहचले होते. तर ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला शिंदे गटाचे नरेश म्हस्के, श्रींरंग बारणे हे दोघे जण उपस्थित होते. या स्नेहभोजनाच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गटाचे खासदार वारंवार एकत्र येतांना दिसत आहेत. त्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे.