इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आपला मेळावा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांचा तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे. आपण बाळासाहेबांचा विचार जिवापाड जपले. त्यामुळेच शिवसेनेची घोडदौड जोरात सुरू आहे, सरडाही रंग बदलतो, पण यांच्या इतके लवकर नाही. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार गमावला, पण हिंदुत्व सोडलं नाही. पण त्यांचे वारसदार म्हणवणारे आज सत्तेसाठी लाचार झाले असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
शिवसेना पक्षाच्या ५९ वा वर्धापन दिन सोहळयात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी तसेच सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिंदे पुढे म्हणाले की, राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा त्यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे. इतकी वर्ष सत्तेत राहुन महापालिकेची तिजोरी फोडणाऱ्यांना आता मुंबईचा लढा आठवला का असा सवाल करून, आगामी निवडणुकीत मुंबईसह सर्वत्र शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.
ते पुढे म्हणाले की, निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र असल्याचा कांगावा काहीजण करतात. पण मुंबई महाराष्ट्राचीच राहणार, कुणाचा बाप जरी आला किंवा सात पिढ्या खाली उतरल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, असेही यावेळी ठणकावून सांगितले.कोविड सेंटर, खिचडी, बॉडीबॅग, कचरा, मिठी नदी गाळ, रस्त्यांवर खड्डे आणि डांबरात पैसे खाल्ले तसेच मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ केलात. आता मिठी नदीच्या मगर मिठीतून कोणी सुटणार नाही. आता एका डिनोची चौकशी सुरु आहे, त्याने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल.
ऑपरेशन सिंदूर’बाबत भारताची भूमिका पटवून देण्यासाठी खासदारांच्या शिष्टमंडळासोबत परदेश दौऱ्यावर गेलेल्या खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि खासदार मिलिंद देवरा यांचे या सोहळ्यात जाहीर कौतुक केले. भारतीय लष्कराने फक्त २० मिनिटांत पाकिस्तानची चरबी उतरवली. मात्र काही जण याबाबत शंका उपस्थित करून पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. त्यांना ‘निशाण-ए-पाकिस्तान’ पुरस्कार द्यायला हवा असे मत व्यक्त केले. येत्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढायच्या आहेत. कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकण्याच्या कामाला लागा,
या मेळाव्यातून शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘हुंडामुक्त महाराष्ट्र’ अभियानाची घोषणा केली. ‘लाडक्या सुनेचे रक्षण, हेच शिवसेनेचे वचन’ असे या अभियानाचे नाव असून हुंडा घेणाऱ्या प्रवृत्तींना पायबंद घालण्याचा दृष्टीने सुरू केलेली जनजागृतीची ही एक सुरुवात असेल असे जाहीर केले.