मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या दीड महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात जी मोठी उलथापालथ झाली आणि जो अभूतपूर्व सत्तासंघर्ष झाला त्याच्या केंद्रस्थानी आहेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे. शिवसेनेत मोठी फूट पडली असून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव यांच्याविषयी बहुविध चर्चा सुरू झाल्या आहेत. उद्धव यांची एकूण संपत्ती किती याविषयी अनेकांना प्रश्न पडला आहे. त्याविषयीच आपण माहिती घेऊया…
उद्धव ठाकरे हे अतिशय संयमी, मितभाषी, आणि मृदू स्वभावाचे राजकारणी आहेत. राजकारणात येण्याआधी ते एक छायाचित्रकार आणि लेखक म्हणून काम करत होते. मात्र २०१९च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांनी सांभाळली. शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे १४३ कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या संपादक होत्या. पण, आता उद्धव यांनी स्वतःकडेच ही जबाबदारी घेतली आहे. २०१८-१९ वर्षात उद्धव ठाकरेंचे वार्षिक उत्पन्न ३८ लाखांपेक्षा अधिक होते. तर त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न ८० लाखांच्या घरात होते. ठाकरे दाम्पत्याने शेअर मार्केट आणि इतर ठिकाणी एकूण ५५ कोटी ७७ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या नावे प्रत्येकी तीन लाखांची एलआयसी पॉलिसी आहे.
ठाकरे दाम्पत्याकडे सोने आणि चांदीचे मिळून दोन कोटींपेक्षाही अधिक रकमेचे दागिने आहेत. तर त्या दोघांच्याही नावावर रायगड जिल्ह्यात सुमारे ११ कोटींची शेतजमीन आहे. याशिवाय अहमदनगर आणि मुंबई येथेही उद्धव ठाकरेंच्या मालकीची जमीन आहे. मुंबईत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर २ बंगले आहेत. या बंगल्यांची एकूण किंमत ५३ कोटींच्या घरात आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी चार कोटींचे तर रश्मी ठाकरेंनी आठ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.
उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना आदित्य आणि तेजस ही दोन मुले आहेत. आदित्य ठाकरे हे आमदार असून राजकारणात सक्रिय असल्याचे दिसून येते. मात्र तेजसला राजकारणात फारसा रस नसल्याचे बोलले जात असले तरी अनेकदा निवडणूक प्रचारावेळी त्याने हजेरी लावली होती. २०१९च्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तापेचात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि मुख्यमंत्री पदाची धुरा उद्धव ठाकरेंकडे आली. उद्धव ठाकरेंच्या रुपाने शिवसेनेला तिसरा तर ठाकरे घराण्याला पहिला मुख्यमंत्री मिळाला.
उद्धव ठाकरे यांना राजकारणात त्यांना फारसा रस नव्हता. त्याआधी राजकारणात त्यांनी कधीच सक्रीय सहभाग नोंदवला नाही पण सामना वृत्तपत्राच्या संपादनाच्या माध्यमातून ते अप्रत्यक्षरित्या राजकारणाच्या सानिध्यात होते. मात्र १९९७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीतून उद्धव ठाकरे यांनी अधिकृतरीत्या राजकारणात पाय ठेवला. त्यानंतरच्या २००२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंवर सोपवली.
२००३ साली बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचे कार्याध्यक्ष पद सोपवले. बाळासाहेबांनंतर शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरेंनी सांभाळली. २००६ साली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे ते संपादक झाले. २०१९ मध्ये झालेल्या राजकीय नाट्यानंतर शिवसेना-भाजपा युती तुटली. शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.
२८ नोव्हेंबर २०१९ रोजी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री होते. त्यांच्या निमित्ताने संयमी, मितभाषी पण तितकाच आक्रमक मुख्यमंत्री राज्याला मिळाला. त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी जनतेला आणि प्रशासनाला विश्वासात घेऊन काम केले. सरकार अल्पमतात आल्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
Shivsena Chief Uddhav Thackeray Total Wealth Property Details