मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. शिवसेनेत फूट पडण्याची परिस्थिती बंडखोरांमुळे नाही तर भाजपमुळे निर्माण झाली आहे. तुम्ही कितीही बाण सोडले तरी माझ्याकडे धनुष्य आहे हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या या विधानाला पक्षाच्या चिन्हासाठी सुरू असलेल्या लढ्याशी जोडले जात आहे. ते म्हणाले की, ठाकरे संकटाला घाबरत नाहीत. कितीही संकटे आली तरी लढूनच पक्षाची नव्याने बांधणी करू, असा निर्धार उद्धव यांनी व्यक्त केला.
उत्तर भारतीय महासंघाच्या नेत्यांशी उद्धव यांनी सेना भवनात संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसोबत असल्याचे सांगितले. बैठकीत उद्धव यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाला की, ‘तुला हवे तितके बाण घेऊन पळ, पण धनुष्य माझ्या पाठीशी आहे हे लक्षात ठेवा. बंडखोरांनी शिवसेना फोडली नाही, त्यामागे भाजप आहे. शिवसेनेला नेस्तनाबूत करण्याचे काम भाजप करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
उत्तर भारतीय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव यांची भेट घेऊन या संकट काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगितले. शिवसेनेच्या १२ खासदारांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. एवढेच नाही तर पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण वर दावा करण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने आता निवडणूक आयोगाकडे जाण्याची तयारी केली आहे. याशिवाय खासदारांच्या गटाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून गटनेते पदावर दावा केला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या १२ बंडखोर खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सोमवारी रात्रीपासून ही सुरक्षा देण्यात आली आहे. या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून राहुल शेवाळे यांना गटनेता म्हणून ओळख देण्याची विनंती केली आहे.
Shivsena Chief Uddhav Thackeray on BJP Conspiracy