इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रीय कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व उबाठा पक्षाच्या माजी नगरसेवकांनी मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या या विशेष सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासह राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर, विदिशा या जिल्ह्यांमधील उबाठा पदाधिकाऱ्यांनीही भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
मंगळवारी पुणे जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव सोनाली मारणे, नगरसेवक राहुल तुपेरे, शहर सरचिटणीस किरण मारणे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या मंगल पवार, गिरीष जैवळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती नगर परिषदेतील माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, माजी नगरसेवक सुधीर सातपुते, प्रमोद गेडाम, अनिता गेडाम, राजू सारंगधर, चंद्रकांत खारकर, शोभा पारखी, शीतल गेडाम, प्रतिभा सोनटक्के, आशा निबांळकर आणि प्रदीप वडाळकर या ११ माजी नगरसेवकांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. धाराशिव जिल्ह्यातील सोमनाथ गुट्टे, आप्पासाहेब बिराजदार, शंकर चव्हाण, नागनाथ कदम, इलाई शेख, शहाजी हाके यांनी सुद्धा आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यासोबतच करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्यामसिंह ठाकूर, उपाध्यक्ष धरमसिंह ठाकूर, राष्ट्रीय संघटक ठाकूर नेमसिंह सिसोदिया, मेवाड एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष जीवन सिंघवी यांनीही त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्यामसिंह ठाकूर यांची शिवसेना राजस्थान ‘राज्य समन्वयक’पदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
तर मध्यप्रदेशातील जबलपूरचे उबाठा उपराज्यप्रमुख शैलेंद्र बारी, विदिशा जिल्हाप्रमुख विजेंद्र लोधी, जबलपूर जिल्हाप्रमुख सुजित पटेल, नगरप्रमुख मुकेश सारठे, इंदोरमधील जावेद खान, अभिषेक कालरा, सुरेश गुर्जर, राजीव चतुर्वेदी यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वयक किरण पांडव तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
मोठ्या संख्येने प्रवेश
ज्यातील कानाकोपऱ्यातून लोक शिवसेना पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश करत आहेत. दिलेला शब्द पाळणे आणि जनतेच्या कामांना प्राधान्य देण्याचे काम शिवसेना करत आहे. काम करणाऱ्या लोकांना शिवसेनेवर विश्वास वाटतो, त्यामुळे दररोज विविध पक्षांचे अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याच विश्वासाच्या बळावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वांनी तयारीला लागावे असे आवाहन आज येथे विशेष पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना केले.