श्रीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जम्मू आणि काश्मीरमधील पेहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे या पर्यटकांचे पार्थिव आणि त्यांच्या नातेवाईकांना सुखरूप राज्यात परत आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले असतानाच आता तिथे अडकलेल्या इतर पर्यटकांना सुखरूप राज्यात आणण्याचे प्रयत्न देखील सुरू झाले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे मदत पथक काल रात्रीच मुंबईहून श्रीनगरसाठी रवाना झाले आहे. या पथकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर, डोंबिवलीचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना विमानात बसवून रवाना केल्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या बाकीच्या पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
ठाणे आणि डोंबिवली येथून काश्मीर सहलीसाठी गेलेल्या 40 आणि 55 जणांच्या ग्रुपशी या मदत पथकाने संपर्क केला असून त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच त्यांच्यासह तिथे अडकलेल्या राज्यातील इतर पर्यटकांच्या देखील ते संपर्कात असून त्यांना देखील सुखरूप राज्यात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या मदत कार्यावर लक्ष ठेवून असून कोणत्याही परिस्थितीत राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे. मात्र सध्या श्रीनगर मधील परिस्थिती नाजूक असून पर्यटकांना परत आणण्यासाठी यंत्रणांशी संपर्क साधून समन्वय साधावा लागत आहे. ही सर्व प्रक्रिया पार पाडण्याचे शर्थीचे प्रयत्न शिवसेनेच्या मदत पथकाच्या वतीने करण्यात येत असून लवकरच केंद्र शासनाच्या मदतीने या पर्यटकांना सुखरूपपणे राज्यात आणले जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.