इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ज्येष्ठ सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली. मराठी भाषा, मराठी माणूस आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याबाबतही राज ठाकरे यावेळी बोलले. या मुलाखतीमध्ये मांजरेकर यांनी शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकतात का असा प्रश्न केला. त्यावर राज ठाकरे यांनी मोठे विधान युतीबद्दल केले आहे. आमच्यातील वाद, आमच्यातील भांडण, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं हे वाद या गोष्टी शुल्लक आहेत असे राज ठाकरे यांनी सांगत उध्दव ठाकरेंना युतीचे संकेत दिले.
त्यानंतर आता उध्दव ठाकरे यांची सकारात्मक प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, मी किरकोळ भांडणं बाजूला ठेवालयला तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी मी एकत्र यायला तयार आहे. त्यांनी अप्रत्यक्ष तयारी दाखवल्यानंतर एक अटही समोर ठेवली. माझ्याकडून कुणाशी भांडण नव्हतंच, पण, एकत्र येण्यासाठी महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे. चोरांच्या गाठीभेटी घ्यायच्या नाही. त्यांचा प्रचार करायचा नाही. अगोदर ही शपथ घ्यावी असेही ते म्हणाले.
या ठाकरे बंधुच्या प्रतिक्रियेनंतर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिथेही ठाकरे आहेत. इथेही ठाकरे आहेत. दोघे भाऊ आहेत. हे नातं कायम आहे. काही राजकीय मतभेद झाले. त्यातून मार्ग वेगळे झाले असले तरी उध्दव ठाकरे यांचा मार्ग कायम महाराष्ट्र हिताचा राहिला आहे. राज ठाकरे यांचे विधान मी पण एेकलं. उध्दव ठाकरे यांनाही एेकलं त्यांनी भूमिका मांडली. या भूमिकेचं स्वागत आहेत. आम्ही सकारत्मक भूमिकेतून याकडे बघतोय असे राऊत म्हणाले. आम्ही वेट अँण्ड वॅाचच्या भूमिकेत आहोत. राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही असेही राऊत म्हणाले. आजही अशी शक्ती आहे की, मराठी माणसाचे नुकसान व्हावे, महाराष्ट्राला पाण्यात पाहात आहेत. अशांना आम्ही घरात घेणार नाही.