इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना एअर इंडियाच्या विमानात तुटलेली खुर्ची मिळाली. त्यानंतर ते चांगलेच भडकले. त्यांनी या सीटवरुन प्रवास पूर्ण केला. पण, त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत टाटांचा उल्लेख करत आपली नाराजी व्यक्त केली.
त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज मला भोपाळहून दिल्लीला यायचे होते, पुसा येथील शेतकरी मेळ्याचे उद्घाटन करायचे होते, कुरुक्षेत्रात नैसर्गिक शेती अभियानाची बैठक घ्यायची होती आणि चंदीगडमध्ये शेतकरी संघटनेच्या सन्माननीय प्रतिनिधींशी चर्चा करायची होती.
मी एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI436 मध्ये तिकीट बुक केले होते, मला सीट क्रमांक 8C देण्यात आला होता. मी जाऊन सीटवर बसलो, सीट तुटलेली होती आणि आतून डेंट झाली होती. बसणे वेदनादायक होते.
जेव्हा मी फ्लाइट अटेंडंटना विचारले की ही सीट खराब आहे, तेव्हा ती का दिली गेली? त्यांनी सांगितले की, व्यवस्थापनाला याआधी कळवले होते की ही सीट चांगली नाही आणि तिकीट विकू नये. एकापेक्षा जास्त अशा सीट आहेत.
माझ्या सहप्रवाशांनी मला माझी सीट बदलून चांगल्या सीटवर बसण्याचा आग्रह केला, पण मी माझ्यासाठी इतर कोणत्याही मित्राला का त्रास देऊ, या सीटवर बसून मी माझा प्रवास पूर्ण करेन, असे मी ठरवले.
टाटा व्यवस्थापनाने पदभार स्वीकारल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारली असेल असा माझा समज होता, पण तो माझा भ्रम ठरला. मला बसण्याच्या गैरसोयीची काळजी नाही, पण प्रवाशांकडून पूर्ण रक्कम वसूल केल्यानंतर त्यांना खराब आणि त्रासदायक सीटवर बसवणे हे अनैतिक आहे. ही प्रवाशांची फसवणूक नाही का?
भविष्यात कोणत्याही प्रवाशाला अशाच प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही याची खात्री करण्यासाठी एअर इंडिया व्यवस्थापन पावले उचलेल का किंवा प्रवाशांच्या लवकर पोहोचण्याच्या सक्तीचा फायदा घेत राहील.