विशेष प्रतिनिधी, मुंबई :
एकेकाळी संपूर्ण देशात दबदबा असलेला काँग्रेस पक्षाची स्थिती सध्या एखाद्या ‘ पूर्वीचा मोठा जमीनदार ‘ असलेला परंतु आता जमिनीचा केवळ एखादा तुकडा शिल्लक असलेल्या नव्या ‘नामधारी जमीनदार ‘ सारखी झाली असून या जमीनदाराला ज्याप्रमाणे आपला भव्य वाडा दुरुस्त करण्यासाठीही संपत्ती शिल्लक नसते, त्यामुळे तो आपला वाडा ही वाचू शकत नाही, अशी स्थिती सध्याच्या काँग्रेस पक्षाची झाली असून त्यांनी भारत देश हा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पूर्वीसारखा राजकिय मतांचा राहिला नाही, हे जाणून घ्यायला हवे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षावर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. कॉंग्रेसची इतर विरोधी पक्षांशी जवळीक तेव्हाच वाढेल जेव्हा त्यांचे नेते काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सत्तेवर नाही हे सत्य स्वीकारतील. पवार पुढे म्हणाले की, ममतांना विरोधी पक्षनेते म्हणून स्वीकारण्यास नकार देत काँग्रेसने सांगितले की, आमच्याकडे राहुल गांधी आहेत.
पवार आणखी म्हणाले की, जेव्हा जेव्हा नव्या नेतृत्वाची चर्चा येते, तेव्हा काँग्रेसमधील माझे मित्र वेगळे मत मांडण्याचा विचार करूच शकत नाहीत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींना विरोधकांचा नवा चेहरा बनवण्याची चर्चा झाली, तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी त्यांच्याकडे राहुल गांधी असल्याचे सांगितले. विशेषत: काँग्रेस पक्षाचे नेते त्यांच्या नेतृत्वावर वेगवेगळी मते मांडण्यास तयार नाहीत, असेही पवार म्हणाले.