इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येण्याची चर्चा सुरु असतांनाच शरद पवारांच्या एका वक्तव्यामुळे या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. जे सत्तेसाठी भाजापसोबत गेले, अशा संधीसाधू लोकांना आपल्याला सोबत घ्यायचे नाही, गांधी, नेहरु, फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारांचे असलेल्या सोबत घेऊ, असे शरद पवार यांनी मंगळवारी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगितले. या स्पष्ट विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता मावळली. शरद पवार यांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया सुध्दा समोर आली आहे. त्यांनी प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे असे सांगत फारसे बोलणे टाळले.
शरद पवार म्हणाले की, कुणाशीही संबध ठेवा पण, भाजपशी संबध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही. त्यामुळे अशा पध्दतीने संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही, त्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची नाहीत असे शरद पवार यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसात शरद पवार व अजित पवार एकाच व्यासपीठावर ब-याचदा दिसले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येणार असल्याची चर्चा झाली. त्यात शरद पवार गटातील एका गटाने सत्तेत असावे असे मत दिले. त्यामुळे त्या चर्चेत अधिक भर पडली. पण, आज शरद पवार यांनी स्पष्ट केल्यामुळे या चर्चेला आता पूर्ण विराम मिळणार आहे.