नाशिक – शहरातील सातपूर परिसराने कोरोना विरुद्ध लढण्यासाठी ऐकी दाखवली आहे. त्यामुळेच सर्वपक्षीय नेते एकत्र जमले आणि त्यांनी आता येत्या सोमवारपासून जनचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी सात दिवस हा जनता कर्फ्यू अत्यंत कडक असणार आहे.
सातपूर परिसरात खासकरुन कामगार राहतात. सद्यस्थितीत अनेक घरांमध्ये कोरोना बाधित आहेत. मात्र, या सर्वांसाठी आवश्यक त्या पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच, कामगारांची आर्थिक परिस्थितीही फारशी भक्कम नाही. ही बाब लक्षात घेऊन सातपूर परिसरातील सर्वपक्षीय नेते आज दुपारी अयोध्या हॉटेलमध्ये एकत्र जमले. स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकील आमदार सीमा हिरे, भाजप नगरसेवक शशी जाधव, शिवसेनेचे नगरसेवक विलास शिंदे, मनसेचे नगरसेवक सलिम शेख, भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील, नगरसेवक भगवान आरोटे, संतोष गायकवाड, योगेश शेवरे, माधुरी बोलकर, हेमलता कांडेकर, पल्लवी पाटील आदी उपस्थित होते.
नाशिक शहरातील एखाद्या उपनगराने प्रथमच अशाप्रकारे जनता कर्फ्यू सुरू करण्यासाठी ऐकी दाखविली आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर शहरातील अन्य भागातही जनता कर्फ्यू लागू होण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारने कलम १४४ लागू करुन निर्बंध कडक केले आहेत. त्यातच आता जनता कर्फ्यू लागू करुन सातपूरकरांनी मोठा पुढाकार घेतला आहे. जनता कर्फ्यू लागू करण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.