नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साल्हेर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व इतिहासात अधोरेखित आहे. या साल्हेर किल्ला पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी शासन प्रयत्न करणार, असे प्रतिपादन कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी केले.
आज साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कृषिमंत्री कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शेरमाळे, उपविभागीय कृषी अधिकारी संदीप मेढे, तालुका कृषी अधिकारी शांताराम भोये यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
कृषिमंत्रीकृषीमंत्री ॲड.कोकाटे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार समाजासाठी आजही प्रेरक आहेत. त्यांची आदर्श विचारसरणी प्रत्येकाने आत्मसात करावी. साल्हेर किल्ला या ऐतिहासिक वास्तूचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होण्यासाठी रोपवेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा. तसेच या ठिकाणी हरणबारी व केळझर या धरणांवर बोटिंग स्थळ विकसित करता येईल. गुजरात राज्यातून येणारे व मांगीतुंगी येथे येणारे पर्यटक येथे भेट देतील. त्यामुळे साल्हेरच्या पर्यटन विकासाला व रोजगाराच्या संधीला चालना मिळेल. येणाऱ्या काळात साल्हेर येथे कृषी पर्यटनासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले
साल्हेरच्या विकासाच्या दृष्टीने आदिवासी संग्रहालय व शिवसृष्टीसाठी 150 कोटीचा आराखडा प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात 75 कोटींची शासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या कामासाठी महसूल विभागाची 50 एकर जमीन संपादनासाठी शासनास प्रस्तावित सादर करण्यात आला असल्याचे आमदार श्री. बोरसे यांनी सांगितले.