पुणे – भारतात राहणा-या हिंदू आणि मुसलमानांचे पूर्वज एकच होते. प्रत्येक भारतीय नागरिक हिंदूच आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. पुण्यातील ग्लोबल ट्रेटेजिक पॉलिसी फाउंडेशनतर्फे झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. सरसंघचालक म्हणाले, समजदार मुस्लिम नेत्यांनी मूलतत्ववादी विचारांविरुद्ध दृढतेने उभे राहिले पाहिजे. भारतातील हिंदू समाज कोणाशीच शत्रुत्व ठेवत नाही. त्यामुळे अल्पसंख्याक समुदायाला कोणालाच घाबरण्याची गरज नाही.
हिंदू हा शब्द मातृभूमी, पूर्वज आणि भारतीय संस्कृतीचा प्रतिशब्द आहे, असे आम्ही मानतो. याने इतर विचारांना अनादर होत नाही. आम्हाला मुस्लिम वर्चस्वाबद्दल नव्हे, तर भारतीय वर्चस्वाबद्दल विचार करायचा आहे. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागेल. भारतावर झालेल्या आक्रमणांमुळे इस्लाम भारतात आला आहे. हाच इतिहास आहे आणि त्याच पद्धतीने तो सांगायला हवा. कट्टरतावादी विचारांना झुकारून समाजातील समजदार नेत्यांनी अनावश्यक मुद्द्यांचा विरोध टाळायला हवा. महासत्ता झाल्यानंतर भारत कोणालाही घाबरवणार नाही, असेही मोहन भागवत यांनी स्पष्ट केले आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि काश्मीर केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू लेफ्टिनंट जनरल (सेवानिवृत्त) सय्यद अता हसनैन या वेळी उपस्थित होते. अधिक विविधतेने समाज समृद्ध होतो. भारतीय संस्कृती सर्वांना समान समजते, असे खान यांनी सांगितले.