अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं)चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असतात. खासकरुन ते त्यांच्या कवितांमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहतात. आता ते चर्चेत आले आहेत ते लोकसभा निवडणुकीवरुन. आठवले हे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. विशेष म्हणदे त्यांना शिर्डीमधून निवडणूक लढवायची आहे. यासंदर्भात ते म्हणाले की, मला शिर्डीत उभे रहायचे आहे पण पडायचे मात्र नाही. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे.
शिर्डी लोकसभेत पुन्हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी स्वतः बोलून दाखवले आहे. ते म्हणाले की, शिर्डीच्या जागेवरून एकदा मी हरलो तरी मी पुन्हा इच्छुक आहे. कारण मी लोकसभेचा माणूस आहे. पुन्हा माझा विचार झाला तर शिर्डीत नव्हे तर नगर जिल्ह्याच्या विकासासाठी माझ्या मंत्री पदाचा उपयोग करता येईल असे आठवले यांनी म्हटले आहे. आठवले हे नगर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आठवले म्हणाले की, मला अनेक नागरिकांचे फोन येतात, त्यावेळेला आमची चूक झाली, तर आता माझे प्रामाणिक इच्छा आहे. मला संधी मिळाली तर मी त्याचं सोनं करेल. शिर्डीतून लोकसभा लढविण्याची माझी इच्छा आहे. जनता, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच भाजप आणि शिंदे गटाची मागणी असेल, मी निवडून येण्याचे वातावरण असेल तर मी तेथून निवडणूक लढेल. भाजप आणि मित्रपक्षाने मला आग्रह केला तर मी निश्चित शिर्डीतून निवडणूक लढेल, असेही आठवले म्हणाले.
खरे म्हणजे पूर्वी एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले विसरलेले नाहीत. त्यांनी अनेकदा येथून पुन्हा निवडणूक लढविण्याची चाचपणी केली होती. आता केंद्रात आणि राज्यातील बदलत्या राजकीय स्थितीनंतर आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डीतून निवडणूक लढविण्याचा निर्धार बोलून दाखविला आहे. तसेच यावेळी शिर्डीतून लढायचे आहे पण पडायचे नाही, अशा निर्धार व्यक्त करताना २००९ साली शिर्डी मतदारसंघातून झालेल्या पराभवाची सल आठवलेंनी आज पुन्हा बोलून दाखवली.
आठवले यांचा शिर्डी लोकसभा मतदार संघात सहा महिन्यात तिसरा दौरा आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे बंडखोर खासदार सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत. लोखंडे हे भाजपकडून तीन वेळा कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून आमदार होते. परंतु शिवसेना फुटल्यावर ते शिंदे गटात गेले. त्यामुळे आता आठवले यांना शिर्डीतून निवडणूक लढायची असेल तर भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
इतकेच नव्हे तर २००९ साली शिर्डीत विखेंचा पाठिंबा मिळाला असता तर तेव्हा आपण पडलोच नसतो. आता शिर्डीतून पुन्हा लढायचं आहे, पण पडायचे नाही, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीच्या जागेवर आपला हक्क सांगितला.
आठवले हे गुरुवारी (दि. १८) अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिर्डीतून पुन्हा लढण्याची आपली इच्छा आहे. पण आता पडायचं नाही.
सन २००९ मध्ये बाळासाहेब विखे यांना दक्षिणेतून लढायचे होते, पण राष्ट्रवादीने त्यांना जागा सोडली नाही. त्यामुळे विखे यांनी शिर्डीत आपल्याला पाठिंबा दिला नाही. त्यांनी पाठिंबा दिला असता तर त्याचवेळी आपण पडलो नसतो. पण आता चित्र वेगळं आहे, असेही ते म्हणाले. राज्यातील शिवसेनेतील वादावर बोलताना आठवले म्हणाले, एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे. त्यांना ४० आमदार, १२ खासदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे धनुष्यबाणाचे चिन्हही त्यांनाच मिळायला हवे. सर्वोच्च न्यायालयातून त्यांना न्याय मिळेल, असा आशावाद आठवले यांनी व्यक्त केला.
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी मराठा समाजाचा आवाज बुलंद केला. मराठा आरक्षणासाठी त्यांनी संघर्ष केला. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी जात असताना त्यांच्या गाडीला अपघात होऊन त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू संशयास्पद आहे. या अपघाताची सीआयडी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे आठवडले म्हणाले. राजस्थानात एका शाळकरी मुलाला पाणी पिण्याच्या कारणावरुन शिक्षकाने बेदम मारहाण केली. यात त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्या शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हावी. राजस्थानात दलितांवर अत्याचार वाढत असूनही मुख्यमंत्री राजस्थानात इतर राज्यांच्या तुलनेत दलितांवर अत्याचार होत नाहीत, असे सांगतात. त्यांचे विधान अत्यंत खेदजनक आहे. त्यांनी दलित समाजाची माफी मागावी, असे आठवले म्हणाले.
बिहारमध्ये झालेल्या सत्तांतराबाबत आठवले म्हणाले, नितीशकुमार यांनी यापूर्वी लालूप्रसाद यांना धोका दिलेला आहे. नितीशकुमार यांच्या पक्षाने कमी जागा जिंकूनही भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. मात्र, त्यांनी भाजपला धोका देऊन पुन्हा लालूप्रसाद यांच्या आरजेडीसोबत युती केली आहे. दोन वर्षात ते आरडीजेडीला धोका देतील व भाजपसोबत येतील. नितीशकुमार यांना धोका देण्याची जुनीच सवय आहे. लोकशाही नव्हे, घोटाळेबाज धोक्यात ईडीकडून होत असलेल्या कारवायांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आठवले म्हणाले, ईडी ज्यांच्याविरोधात पुरावे सापडत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई होत आहे. यात भाजपचा काडीचाही संबंध नाही, असा दावा त्यांनी केला.
RPI President Ramdas Athawale Loksabha Election
Constituency Shirdi