इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला ४८ तर आपला २२ जागा मिळाल्या. दोन वेळा सलग सत्तेत असलेल्या या निवडणुकीत आपला मोठा धक्का बसला. त्यानंतर यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही फोटो पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी डोंगराएवढं काम करुनही पराभव असे म्हटले आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, दिल्ली विधानसभेचा निकाल हा धक्कादायक आहे. आम आदमी पक्षाने आणि विशेषतः मनीष सिसोदिया साहेब यांच्यासारख्या निरलस व्यक्तीमत्त्वाने सामान्य माणसासाठी शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात देशात कुठंही झालं नाही असं डोंगराएवढं काम दिल्लीत उभं केलं. तरीही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागत असेल तर निवडणुकीच्या राजकारणातून विकास हद्दपारच होईल आणि नेतेही विकासकामं करणं सोडून केवळ द्वेषाचंच राजकारण आणि इव्हेंटबाजीच करतील की काय, याची भीती वाटते.
या निकालाने विकास करावा की नाही, असा प्रश्न पडला तर तो चुकीचा ठरणार नाही! एकीकडं विकास तर दुसऱ्या बाजूला सत्ता, संपत्ती आणि गुंडगिरी, या पर्यायात विकासाचा पराभव झाला आणि यामुळं सामान्य माणसालाच अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, याचं अधिक दुःख वाटतं.
असो! गेली दहा वर्षे मुख्यमंत्र्यांना अनेक अडथळ्याची शर्यत पार करावी लागली, पण आता किमान मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल हे पायात पाय न घालता हातात हात घालून काम करतील आणि जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील, ही अपेक्षा!