इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एकीकडे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती केल्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
या कोट्यावधी रुपयांच्या जाहिराती सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्या असून ते भाजपाचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असा देखील आरोप केला. या आरोपानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या आक्षेपाला उत्तरही दिले. त्यानंतर पुन्हा रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत म्हटले आहे की,
मा. बावनकुळे साहेब, तुम्ही रोज ४० कोटी ऐवजी ४०० किंवा ४००० कोटीच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही, पण या जाहिराती निवावी का छापल्या गेल्या? याबद्दल आमचा आक्षेप आहे. कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल.
या जाहिराती सरकारने दिल्या असतील तर एकीकडं पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात असताना, बिले पेंडिंग राहिल्याने कंत्राटदार आत्महत्या करत असताना जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का?
या जाहिराती भाजपने दिल्या असतील तर भाजपने आपल्या नावाने जाहिरात का दिली नाही? भाजपने दिली नाही तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का? उदा. तुम्ही महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा ९० कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का?
या जाहिरातीच्या प्रकरणात काहीही काळेबेरं किंवा लपवण्यासारखं नसेल तर एवढे कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या, हे आपण जाहीर का करत नाही? करा जाहीर!