लखनऊ (उत्तर प्रदेश) – महोबा येथे एका मंदिराच्या बांधकामावरून धार्मिक तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महोबा भागातील पानवारी येथील बुडेरा गावात घडलेल्या या घटनेने तणाव निर्माण झाला आहे. नदीकाठी असलेले साईबाबा मंदिर व साईबाबांची मूर्ती हटवत दुसरीच मझार (समाधी) बनवून रात्रभर हिरवे झेंडे लावण्यात आले. त्यामुळे हा तणाव निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, ग्रामपंचायत बुडेरा येथील माजरा सिमरिया येथे नदीजवळ साईबाबा मंदिर आहे. रात्री काही समाजकंटकांनी येथून साईबाबांची मूर्ती काढून नदीकाठच्या झुडपात फेकून दिली. तसेच तेथे रातोरात मजार बांधण्यात आली आणि हिरवे झेंडे देखील लावण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी काही ग्रामस्थ मंदिरात दर्शनासाठी पोहोचले असता संतापाचा उद्रेक झाला.
काही वेळाने सर्व भाविक मंदिराच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ मजार हटवून मूर्तीची प्रतिष्ठापना करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुरू केली. माहिती मिळताच एसडीएम कुलपहार श्वेता पांडे, एसएचओ पनवारी शिवसरे यांनी पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचून तपास केला. तणावाच्या पार्श्वभूमीवर मंदिराभोवती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर एसडीएमच्या उपस्थितीत समाधी हटवून मंदिराला पांढरा रंग देण्यात आला. तेव्हाच गावकरी काहीसे शांत झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली आणि गावकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच पूर्वीप्रमाणेच मंदिरात पूजा होईल, असे सांगितले.
बुडेरा गावातील साईबाबा मंदिरात एका रात्रीत समाधी बांधल्याच्या घटनेमागे कोणत्याही बाहेरच्या नागरिकांचा हात असल्याचे ग्रामस्थ मान्य करत नसून, हे बांधकाम सुनियोजित षडयंत्रातून होत असल्याची चर्चा आहे. ग्रामस्थ सांगतात की, या ठिकाणी वर्षानुवर्षे पूजा सुरू आहे, मात्र रातोरात बांधकाम करून घेणे हे कोणा एका व्यक्तीचे काम नाही. बेकायदा बांधकामे एकत्रितपणे करण्यात आली. अशा समाजकटंकावर कारवाई झाली पाहिजे.