इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंजाबमध्ये आलेल्या विध्वंसक पुरातून दिलासा मिळावा यासाठी रिलायन्स गेल्या अनेक दिवसांपासून राज्य प्रशासन, पंचायत संस्था आणि स्थानिक स्वयंसेवी संघटनांसोबत खांद्याला खांदा लावून कार्यरत आहे. विशेषतः अमृतसर आणि सुलतानपूर लोधी या अतिपूरग्रस्त भागांत तत्काळ मदत पोहोचवली जात आहे. कंपनीने पोषण, निवारा, सार्वजनिक आरोग्य आणि पशुधन या स्तरांवर दहा सूत्री मदतकार्य सुरू केले आहे.
जमिनीवर रिलायन्स अनेक प्रकारची मदत पुरवत आहे. पुरग्रस्तांना पोषण मिळावे यासाठी १० हजारांहून अधिक कुटुंबांना अन्नधान्याचे किट्स दिले जात आहेत. महिला किंवा ज्येष्ठ नागरिक हे घरप्रमुख असलेल्या १ हजार कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे व्हाउचर दिले जात आहेत. सामुदायिक स्वयंपाकासाठी धान्यसाठा आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी पोर्टेबल वॉटर फिल्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विस्थापित कुटुंबांसाठी ताडपत्री, ग्राउंडशीट, मच्छरदाणी, दोऱ्या आणि बिछाने यांसारखी अत्यावश्यक साहित्ये वितरित करण्यात आली आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी म्हणाले, “या दुःखाच्या क्षणी आमच्या संवेदना पंजाबमधील लोकांसोबत आहेत. अनेकांनी आपली घरे आणि उपजीविका गमावली आहेत. पूर्ण रिलायन्स परिवार पंजाबच्या सोबत खंबीरपणे उभा आहे. लोकांसोबत जनावरांसाठी देखील अन्न, पाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था केली जात आहे. आमची दहा सूत्री मदतयोजना सुरू असून या कठीण काळात आम्ही प्रत्येक पावलावर पंजाबसोबत आहोत.”
पूराच्या काळात व त्यानंतर साथरोग पसरू नयेत यासाठीही रिलायन्स काळजी घेत आहे. जलस्रोत निर्जंतुक करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रत्येक प्रभावित कुटुंबाला स्वच्छता संबंधी वस्तूंनी युक्त किट दिले जात आहे. ज्या जनावरांना त्वरित उपचाराची गरज आहे त्यांना तत्काळ मदत पुरवली जात आहे. रिलायन्स फाउंडेशन, वनतारा आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांसाठी वैद्यकीय शिबिरं उभारण्यात येत आहेत. सुमारे ५ हजार जनावरांसाठी ३ हजार सायलेज बंडल्स वाटप करण्यात आले आहेत.
वनताराची ५० हून अधिक सदस्यांची तज्ज्ञ टीम आधुनिक बचाव उपकरणांसह कार्यरत आहे. वाचवलेल्या जनावरांचे उपचार, मृत जनावरांचे सन्मानपूर्वक वैज्ञानिक दहन आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने रोगराईचा प्रसार रोखण्याचे काम ती करत आहे. रिलायन्सच्या टीम्स जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक पंचायतांसोबत २४ तास कार्यरत आहेत.
जिओची पंजाब टीम, एनडीआरएफच्या पथकांसह समन्वयाने पुरग्रस्त भागांत नेटवर्क पुन्हा सुरू करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करत आहे. संपूर्ण राज्यात १००% कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी जिओचे कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. रिलायन्स रिटेलही २१ आवश्यक वस्तूंचा सुक्या धान्याचा किट तसेच स्वच्छतेसाठी किट्स पाठवत आहे. कंपनीने म्हटले आहे की, या संकटाच्या काळात आम्ही पंजाबच्या जनतेसोबत खांद्याला खांदा लावून उभे आहोत.