इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुढील पाच वर्षांत असाम मध्ये कंपनीची गुंतवणूक चौपट वाढवून 50 हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याची घोषणा केली आहे. अंबानी यांनी सांगितले की, रिलायन्सने आधीच राज्यात 12 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे, जी त्यांच्या 5 हजार कोटींच्या पूर्वीच्या वचनबद्धतेपेक्षा खूपच जास्त आहे. ते गुवाहाटीमध्ये ‘ऍडव्हांटेज आसाम 2.0 समिट’मध्ये बोलत होते.
अंबानी यांनी रिलायन्सच्या प्राधान्य क्षेत्रांबद्दल माहिती देताना सांगितले की, ते आसामला AI-रेडी बनवू इच्छितात. राज्यात जागतिक दर्जाचे कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केल्यानंतर, आता रिलायन्स येथे अत्याधुनिक संगणकीय सुविधांची उभारणी करणार आहे. त्यांनी जाहीर केले की, रिलायन्स असाममध्ये एक AI-रेडी एज डेटा सेंटर स्थापन करेल. तसेच, रिलायन्स रिटेल आपल्या स्टोअर्सची संख्या 400 वरून 800 पर्यंत वाढवणार आहे, ज्यामुळे हजारो तरुणांना थेट व अप्रत्यक्ष रोजगार संधी मिळणार आहेत.
याशिवाय, असामला स्वच्छ आणि हरित ऊर्जा केंद्र बनवण्याची बांधिलकीही अंबानी यांनी व्यक्त केली. राज्यातील बंजर जमिनीवर दोन बायोगॅस प्लांट उभारले जातील, ज्यामुळे दरवर्षी 8 लाख टन स्वच्छ बायोगॅसचे उत्पादन होईल. हे इंधन दररोज 2 लाख प्रवासी वाहनांना पुरवले जाऊ शकते. त्यांनी असाममध्ये एक मेगा फूड पार्क उभारण्याची घोषणा केली, ज्यामुळे असाम देश-विदेशात खाद्य आणि इतर उपभोक्ता उत्पादनांचा मोठा पुरवठादार बनू शकतो. तसेच, त्यांनी नुकत्याच सुरू झालेल्या असाममधील कॅम्पाच्या बॉटलिंग प्लांटचाही उल्लेख केला.